वडवणी : पंधरा दिवसापुर्वी लग्न झालेल्या नववधुचे सोमवारी रात्री अपहरण झाल्याची तक्रारीनंतर प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना सदर नववधू अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी तिच्या माहेरच्या आणि सासरच्या एकूण १३ जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविला असल्याची घटना वडवणी येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडवणी तालुक्यातील खडकी येथील २५ वर्षीय तरुण १४ जून रोजी मुलगी पाहण्यासाठी बीड तालुक्यातील कामखेडा येथे गेला होता. त्याला मुलगी पसंद पडल्याने दोन्हीकडील नातेवाईकांच्या संमतीने त्याच दिवशी त्यांचा विवाह लावून देण्यात आला. रात्री नववधूला घेऊन सर्वजण खडकीला परतले. दुसर्या दिवशी देवदर्शनाचे विधी पार पडल्यानंतर रात्री नववधू नैसर्गिक विधीचे कारण सांगून घराबाहेर पडली. बराच वेळ झाल्यानंतरही ती परत आली नाही. आजूबाजूला शोध घेऊनही ती न सापडल्याने तिच्या पतीने वडवणी ठाण्यात पत्नीचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदविली. अज्ञात व्यक्तीवर अपहरणाचा गुन्हा नोंद झाल्यानंतर या प्रकरणाचा तपास पो.ना. राम बारगजे करीत होते. पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांचे जबाब घेतले असता त्यात संबंधीत नववधू १६ वर्षे ६ महिने वयाची अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी कामखेडा येथील जिल्हा परिषद शाळेतून त्या मुलीचा निर्गम उतारा काढल्यानंतर ती अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी वडवणी ठाण्यात त्या अल्पवयीन मुलीच्या माहेरच्या आणि सासरच्या लोकांसह लग्नाला उपस्थित असलेल्या व्यक्तींविरुद्ध तक्रार दिली. सदर तक्रारीवरून मुलीचे आणि मुलाचे आई-वडील, पती आणि इतर नातेवाईक असे एकूण १३ जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान हा गुन्हा बीड ग्रामीण ठाण्यात वर्ग करण्यात आला असून अपहरणाचा तपास वडवणी पोलीस करीत आहेत.