किल्लेधारुर दि.१५(वार्ताहर) येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या ३२ जनांना आणखी १४ दिवस विलगीकरणातच ठेवण्याचा निर्णय वरिष्ठ अधिकाऱ्यानी घेतल्यानंतर आज जिल्हा बंदी आदेश डावलल्या प्रकरणी १२० उसतोड मजूरांना निवासी ठेवण्यात आले आहे त्यांचे १४ दिवस आज पुर्ण होत असुन त्यांचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दि.२ एप्रिल रोजी सांगली जिल्ह्यात ऊसतोड मजूरी करणाऱ्या ७४ व त्यानंतर अडवण्यात आलेल्या अशा १२० उसतोड मजुरांना जिल्हाबंदीचे आदेशाचे उलंघन केल्याने पोलिसांनी अडवले होते. त्यांच्या वाहनावर गुन्हे नोंद करत संबंधित उसतोड मजुर कुटूंबियातील व्यक्तींना येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात निवासी ठेवण्यात आले आहे. या मजूरांना गेल्या १४ दिवसांपासुन स्वंयसेवी संस्थांच्या मदतीने भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे. दिवसेंदिवस लॉकडाऊन वाढत असुन प्रत्येकाला घराची ओढ लागलेली आहे. संबंधित वाहन धारकांकडे त्या त्या जिल्ह्यातील पोलिस व महसुल प्रशासनाचे मजूर वाहतूकीचे परवाने असल्याचीही माहिती मिळाली आहे. जवळपास तीन जिल्ह्यांच्या सिमा ओलांडून आल्यावर धारुर येथे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. आज १४ दिवस पुर्ण झाल्यानंतर त्यांची रवानगी होणार की आणखी प्रतिक्षा करावी लागणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे या लोकांची निवासाची सोय झाली असली तरी भविष्यात भोजन व्यवस्था होण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. यापुर्वी तालुक्यातील ६ ऊसतोड मजूर व त्यांच्या संपर्कात आलेल्या २६ अशा ३२ जनांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. १४ दिवसानंतर आणखी १४ दिवस त्यांचा विलगीकरणातील मुक्काम वाढला आहे. म्हणून या १२० उसतोड मजुरा बाबत प्रशासन कोणती भुमिका घेते याकडे निर्वासितांचे लक्ष लागून आहे.