किल्लेधारूर दि.२६(वार्ताहर) जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार गर्दी करणे, मास्क न वापरने, वाहतूकीचे नियम मोडल्यास नगर परिषद व पोलिस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत असून नागरिकांनी दक्षता बाळगुन सहकार्य करावे नसता कारवाई अटळ असल्याची माहिती धारुर पोलिस ठाण्याच्या प्रभारी सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरेखा धस यांनी दिली.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार व जिल्हा पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत सुट देण्यात आली आहे. नवीन आदेशात मोठ्या प्रमाणात शिथिलता देण्यात आलेली आहे. मात्र लोकांकडून अनेक नियमांचे भंग होत असून कायदा मोडण्याचे प्रमाण जास्त दिसुन येत आहे. सांयकाळी ६.३० नंतर अनेक ठिकाणी सर्रास आस्थापना, व्यवसाय सुरु ठेवणे, गर्दी करणे, सोशल डिस्टंट न पाळणे, मास्क न वापरणे, वाहतूकीच्या नियमांचे उलंघन करणे अशा प्रकारावर पोलिस व नगर परिषद प्रशासन कारवाई करत आहे. शहरात दुचाकीधारक सर्रास नियमभंग करत आहेत. त्यांच्यावर दंडात्मक कारवाया करण्यात येत आहेत. नियमानूसार दुचाकी साठी केवळ एक व्यक्ती, तीन चाकी वाहनासाठी दोन प्रवासी एक चालक, चार चाकी वाहनात एक चालक व दोन सहप्रवासी विनाअट प्रवास करु शकतात. शहरात दुचाकी चालकांची विनाकारण वर्दळ, विना सायलंसर दुचाकी चालवून ध्वनीप्रदुषण करणे तसेच शहरात पार्किंगचे नियम तोडणे अशा प्रकाराना आळा घालण्यासाठी पोलिस कारवाई करण्यात येत आहे. वाहतूकीच्या नियमासह जिल्हा प्रशासनाने कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिलेल्या नियमांचे पालन करुन जनतेने सहकार्य करावे नसता कारवाई होणारच अशी माहिती सहाय्यक पोलिस निरिक्षक सुरेखा धस यांनी दिली आहे.