मुंबई दि.13 एप्रिल – महाराष्ट्रात ‘मी पुन्हा येईन’ चे वारे वाहू लागल्याचे बुधवारी अंजलि दमानिया यांच्या ट्विटनंतर पुन्हा राजकीय चर्चांना उधान आले आहे. दरम्यान याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी येवढ्या मोठ्या नेत्याबाबत मी काय बोलणार असा उपरोधिक टोला लगावला.
( Winds of ‘I will come again’ in Maharashtra… political developments fuel discussions. )
आपच्या माजी नेत्या आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विटरवर खळबळजनक दावा केला. ‘आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार ( Ajit Pawar ) भाजप बरोबर जाणार आहेत…. तेही लवकरच बघू….. आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची’, असं ट्वीट अंजली दमानिया यांनी केलं आहे.
याच दरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा राजकीय भूकंप होण्याच्या चर्चांना उधान आले आहे. सत्ताधारी शिवसेना भाजप (Shivsena BJP) विरोधी पक्षांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेतील बंडाळीनंतर आता राष्ट्रवादीला (NCP) धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीचे काही आमदार सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येतं असून जवळपास 20 आमदारांचा गट पक्षाविरोधात बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, मुंबईमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली.