BEED24

सकाळी सुरु झालेली बस सेवा दुपारी बंद

किल्लेधारूर दि.२२(वार्ताहर) तब्बल दोन महिने बंद असलेली राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा आज दि.२२ मे रोजी सकाळी सात वाजता सुरु करण्यात आली होती. मात्र प्रवाशांनी प्रवासाला पाठ फिरवल्याने दुपारीच बस फेऱ्या बंद करण्यात आल्या.

राज्य शासनाने अध्यादेश काढून नॉन रेड झोनमध्ये जिल्हा अंतर्गत बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावरुन नॉन रेड झोनमध्ये असलेल्या बीड जिल्ह्यात आज पासुन जिल्हा अंतर्गत बससेवा सुरु करण्यात आली. धारुर आगारातून बीड, अंबाजोगाई, केज साठी दर तासाला एक बस सोडण्यात येणार होती. केज ते माजलगावसाठी दोन बस फेऱ्या करण्यात येणार होत्या. आज सकाळी बस सेवेला प्रारंभ झाला. दि.२२ मार्च पासुन बंद असलेली बससेवा बरोबर दोन महिन्यानंतर सुरु झाली. यामुळे लोकांची प्रवासाची सोय होईल असे वाटत असताना मात्र चक्क प्रवासीच उपलब्ध झाली नाहीत. एरव्ही एकावर एक बसण्याची तयारी ठेवणारा प्रवासी अचानक गायब झाल्याचे दिसुन आले. प्रवाशा अभावी बस सेवा सुरु ठेवण्यात राज्य परिवहन महामंडळास परवडणारे नाही. धारुर आगाराला गेल्या दोन महिन्यात प्रतिदीन पाच लाख प्रमाणे नुकसान सहन करावे लागलेले आहे. प्रवाशी उपलब्ध होत नसल्या कारणाने दुपारीच बस सेवा बंद करण्याचा निर्णय आगार प्रमुख शंकर स्वामी यांनी घेतला.

Exit mobile version