BEED24

स्वदेशी लसीचा दावा फोल? आयसीएमआरचा मुखभंग

दिल्लीः लस तयार झाली, तरी तिच्या प्राण्यांवर तसेच मानवावर दीर्घ काळ चाचण्या घ्याव्या लागतात, हे विज्ञान समजत नसलेल्यांनाही ठावूक आहे. जगात सध्या कोरोनाच्या विषाणूचा प्रसार वेगाने होतो आहे. एक कोटींहून अधिक रुग्ण झाले आहेत, तर पाच लाख लोकांचे मृत्यू झाले आहेत. भारतातही कोरोनाच्या रुग्णांचा आकडा सहा लाखांहून अधिक झाला आहे. अशा परिस्थितीत एवढ्या महाभयंकर साथीच्या विकारावर लस आणताना त्याच्या चाचण्या आणि त्याचे अनुकूल,. प्रतिकूल परिणामांचा अभ्यास करावा लागतो.

चाचण्या एक-दोन महिने करून चालत नाहीत. विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या विशेष राजदूतांनी दीड-दोन वर्षे तरी कोरोनावरील लस बाजारात येणार नाही, असे स्पष्ट केले असताना अखिल भारतीय वैद्यक संशोधन परिषदे (आयसीएमआर) ने १५ ऑगस्टपर्यंत कोरोनावरील लस बाजारात येईल, असे सांगितले. जगात अनेक कंपन्या असा दावा करीत असताना जागतिक आरोग्य संघटनेच्या विशेष राजदूतांनी मात्र हे दावे फेटाळून लावताना असे दावे करणा-यांकडे पुरावे मागितले पाहिजेत, असे ठासून सांगितले. या पार्श्वभूमीवर आयसीएमआरने केलेला दावा वादाच्या भोव-यात सापडला.

देशातील साथरोगतज्ज्ञांसह अन्य वैद्यकीय तज्ज्ञांनी आयसीएमआरचा दावा अतिरंजित असल्याची टीका केली. आयसीएमआरने केलेला दावा प्रत्यक्षात येणार नाही आणि आला, तरी त्याची परिणामकारकता नक्की सांगता येणार नाही, तसेच लवकर लसी बाजारात आणण्याच्या प्रयत्नांत नागरिकांच्या जीविताशी खेळ होईल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला. जगातील १४० लसींपैकी ११ लसी या मानवी चाचणीच्या टप्प्यावर आहेत. यापैकी दोन लस भारतात तयार झालेल्या आहेत; पण कोरोना विषाणूवर घाईघाईत लस बनवण्यात येते, असा आरोप आरोग्यतज्ज्ञांनी आणि राजकीय नेत्यांनी केल्यानंतर आयसीएमआरने शनिवारी यावर स्पष्टीकरण दिले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाल किल्ल्यावरील घोषणेसाठी हा सारा आटापिटा चालला असल्याची टीका काँग्रेसने केली होती. काँग्रेसच्या टीकेची सरकारने फारशी दखल घेतली नसती; परंतु भारतातील तसेच जागतिक तज्ज्ञ एक-दीड वर्षात लस बाजारात येणार नाही, असे ठासून सांगत होते. त्याची दखल केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाने घेऊन आयसीएमआरचा दावा फेटाळून लावला. लस तयार होण्यासाठी आणखी वर्षभर तरी लागेल, असे स्पष्ट केले. त्यातून आयसीएमआर तोंडघशी पडली.

वैद्यकीय संशोधन परिषद ही वैद्यकीय क्षेत्रातील स्वायत्त संस्था असून तिने कुणाच्या निर्देशानुसार १५ ऑगस्ट ही लस तयार होण्याची तारखी सांगितली, हा संशोधनाचा भाग आहे. कोरोनावरील स्वदेशी लस २०२१ पूर्वी तयार होण्याची शक्यता नाही, असे विज्ञान मंत्रालयाने म्हटले हे चांगले झाले. आयसीएमआरने यासाठी कही निवडक हॉस्पिटल्स आणि संस्थांना ट्रायल प्रक्रियेला वेग देण्याचे निर्देशही दिले होते. आयसीएमआरने ज्या भारत बायोटेकचा नामोल्लेख करून या कंपनीची लस १५ ऑगस्टपर्यंत बाजारात येईल, असे सांगितले होते, त्या कंपनीनेही अजून एक वर्ष तरी लस बाजारात येणार नाही, असे सांगितल्याने आयसीएमआरचा   मुखभंग झाला.

Exit mobile version