गेवराई दि. ४ (प्रतिनिधी)- गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथे शेतात जाणाऱ्या शेतकऱ्याला अवैध वाळू उपसा करणाऱ्या हायवाने चिरडल्याचा हृदय पिळवटून टाकणारा अपघात (Accident) घडला असून या अपघातानंतर ग्रामस्थांनी आक्रमक भुमिका घेवून ठिय्या करत छिन्न विछिन्न झालेले प्रेत ताब्यात न घेण्याचा निर्णय घेतल्याची घटना आज सकाळी घडली. अद्यापही फरार हायवाचा शोध लागलेला नसुन ग्रामस्थांचा ठिय्या सुरुच आहे. उपविभागीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
गेवराई (Gevrai) तालुक्यातील सावळेश्वर , राक्षसभूवन , तसेच गंगावाडी या परिसरातून मोठ्या प्रमाणात अनाधिकृत वाळू उपसा होत आहे. अनेक तक्रारी होवूनही महसुल व पोलीस प्रशासन बघ्याची भुमिका घेत आहे. प्रशासनाच्या नाकारतेपणामुळे आज सकाळी एका शेतकऱ्याचा बळी गेला. गेवराई (Gevrai) तालुक्यातील गंगावाडी येथील रहीवाशी रुस्तूम मते (६०) या शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यास एका अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा वाहनाने चिरडले. यात शेतकऱ्याच्या शरीराची रस्त्यावर छिन्न विछिन्न अवस्था झाली. एक नसुन दोन हायवा या व्यक्तीच्या अंगावरून गेल्याचे सांगितले जात आहे. या हृदय हेलावून टाकणाऱ्या अपघातामुळे (Accident) गांवकरी आक्रमक झाले असुन त्यांनी राक्षसभूवन रस्त्यावर ठिय्या मांडला आहे. जो पर्यंत जिल्हाधिकारी येत नाहीत तोपर्यंत शव ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. दुपारी १ पर्यंत सदरील हायवाचा शोध लागला नसल्याने ठिय्या आंदोलन सुरुच असून रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेला शव आहे त्याच स्थितीत असल्याची माहिती कळाली. उपविभागीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून ग्रामस्थांशी चर्चा करत आहेत.