BEED24

आता एटीएम मधून ५ हजारापेक्षा अधिक रक्कम काढल्यास लागणार अतिरिक्त शुल्क?

दिल्लीः दि.२०-भारतीय रिझर्व्ह बँकेने एटीएम शुल्काच्या समिक्षेबाबत जून महिन्यांत एक समिती नेमली होती, या समितीने आपल्या सिफारशी बँकेकडे सोपवल्या आहेत. या नवीन शिफारशीनूसार येत्या काही दिवसांत एटीएम मधून ५ हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढल्यास त्यावर अतिरिक्त शुल्क द्यावं लागू शकतं. हा नवा नियम सध्याच्या पाच मोफत व्यवहारांमध्ये समाविष्ट असणार नाही.

काही वर्षांपूर्वी बँकेकडून मोफत मिळणारे एटीएम कार्ड गेल्या दोन वर्षांपासुन वार्षिक रक्कम भरुन मिळत आहे. याच कार्ड च्या माध्यमातून एटीममधून पैसे काढल्यास त्यास कसलाही खर्च नव्हता. हळूहळू यात बदल होत आता एटीएम वापरणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. सध्या एटीएम मधून महिन्यात पाच मोफत व्यवहार करता येऊ शकतात. त्यानंतर त्याच महिन्यात सहावा व्यवहार झाला तर ग्राहकाला २० रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागते. आरबीआयने नेमलेल्या समितीच्या शिफारशींनुसार आठ वर्षांनंतर एटीएमच्या शुल्कामध्ये बदल होऊ शकतो. मध्य प्रदेशचे एलएलबीसी समन्वयक एस.डी. माहुरकर यांच्या माहितीनुसार, समितीने दहा लाखांपेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांमध्ये एटीएम मधून व्यवहार वाढवण्यावर भर दिला आहे. या ठिकाणी जास्त करुन लोक छोटी-छोटी रक्कम काढतात. यासाठी समितीने नव्या नियमांनुसार छोट्या व्यवहारांनाच मोफत व्यवहारांमध्ये ठेवलं आहे. छोट्या शहरांमध्ये ग्राहकांना दुसऱ्या बँकांच्या एटीएम मधून प्रत्येक महिन्याला सहा वेळा पैसे काढण्याची सूटही या नव्या नियमामुळे मिळू शकते. सध्या छोट्या शहरांमध्ये केवळ पाच वेळाच पैसे काढता येतात. महानगरांमध्ये ग्राहकांना एका महिन्यांत एटीएममधून तीन वेळा पैसे काढण्याची सूट आहे. यानंतर चौथ्यांदा पैसे काढल्यास अतिरिक्त शुल्क लागते.

Exit mobile version