नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांचे आवाहन
बीड दि. 07 :- (प्रतिनिधी) गेल्या सात महिन्यापुर्वी सुरु झालेली कोरोना साथ रोगाचे प्रतिबंध ३१ आक्टोंबरपर्यंत सुरुच राहणार आहेत. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा नवरात्रोत्सव, दुर्गापूजा, दसरा साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने या वर्षीचा नवरात्रोत्सव, दुर्गापूजा, दसरा साजरा करणे बाबत पुढील मार्गदर्शक सूचना प्रशासनाकडून जनतेस देण्यात आल्या आहेत.
कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगर पालिका, नगर पंचायत, पोलीस प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले आहे. सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांनी नगर पालिका, नगर पंचायत, स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानूसार यथोचित परवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच मा. न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि नगर पालिका, नगर पंचायत तसेच स्थानिक प्रशासनाने मंडपां बाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा नवरात्रोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मूर्तींची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी. देवीच्या मूर्तींच्या उंची सार्वजनिक मंडळाकरीता 4 फूट व घरगुती देवीच्या मूर्तींची उंची 2 फूटांच्या मर्यादेत असावी. यावर्षी शक्यतो पारंपारिक देवीच्या मूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मुर्तीचे पुजन करावे. मुर्ती शाडूची, पर्यावरण पूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात नगर पालिका, नगर पंचायत तसेच स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा. नवरात्रोत्सवा करीता वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्विकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच “माझे कुटूंब माझी जबाबदारी” या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी. गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम, शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरती, भजन, किर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना 05 पेक्षा जास्त व्यक्ती जमणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदूषणा संदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्यात यावे. देवीच्या दर्शनाची सूविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यांदीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. देवीच्या मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारिरिक अंतराचे (फिजिकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे. देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नये. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीस विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वयस्कर नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळींतील, इमारतीतील सर्व घरगुती देवीच्या मुर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये. नगर पालिका, नगर पंचायत, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादीच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी. तसेच नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय मूर्ती स्विकृत केंद्राची व्यवस्था करावी व याबाबत जास्तीत जास्त प्रसिध्दी देण्यात यावी. मंडपात एकावेळी 5 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपामध्ये खाद्यपदार्थ अथवा पेय पानाची व्यवस्था करण्यास मनाई असेल. विसर्जनाच्या तारखेस जर घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्रात असेल तर, मूर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल. दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून प्रतिकात्मक स्वरुपाचा असावा. रावण दहनाकरीता आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील. प्रत्यक्ष बोलावू नयेत. त्यांना फेसबुक इत्यादी समाज माध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे बघण्याची व्यवस्था करावी.