मुंबईः दि.२७- पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण (Pooja Chavan suicide case) विधिमंडळाच्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्रासदायक ठरू शकते, हे लक्षात घेऊनच वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, असा सूर सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये आहे. आज भाजपाकडून (BJP) राज्यभरात चक्का जाम आंदोलन करत प्रकरणाची तीव्रता दाखवून दिली. यामुळे संजय राठोड यांच्या राजीनामा बाबत मुख्यमंत्री निवासस्थान ‘वर्षा’ बंगल्यावर शिवसेना (Shiv Sena) नेत्यांची बैठक सुरु झाली असून काही वेळात राजीनामा विषयावर निर्णय होवू शकतो.
(Decision on the resignation of Sanjay Rathore … Decision in the meeting of Shiv Sena leaders on ‘Varsha’)
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण (Pooja Chavan suicide case) भाजपने लावून धरले आहे. विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात या प्रकरणावरून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला घेरण्याची भाजपची रणनीती आहे. वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या राजीनाम्याच्या (resignation) मागणीवर भाजप (BJP) ठाम आहे. सत्ताधारी शिवसेना (Shiv Sena) राठोड यांना पाठीशी घालीत असल्याचा आरोप भाजपकडून केला जातो. राठोड हे अधिवेशनात मंत्रिपदी कायम राहिल्यास विरोधकांना महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्याची संधी मिळणार आहे.
संजय राठोड यांना ‘मातोश्री’चे अभय असल्याचे चित्र निर्माण झाले. शिवसेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने राठोड यांची बाजू लावून धरली होती. राठोड यांच्या राजीनाम्यावरून शिवसेनेतही दोन मतप्रवाह होते. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये भाजपच्या अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप झाले. प्रत्येक वेळी फडणवीस यांनी स्वपक्षीय मंत्र्यांना अभय दिले होते. या पाश्र्वभूमीवर राठोड यांचा लगेचच राजीनामा (resignation) घेऊ नये, असा मतप्रवाहही पक्षात आहे. विधानसभेत फडणवीस यांनी आरोप केल्यास त्यांच्या मंत्रिमंडळात मंत्र्यांवर झालेले आरोप आणि या मंत्र्यांना कसे पाठीशी घातले याची जंत्रीच सभागृहात सादर करण्याची तयारी शिवसेनेच्या नेत्यांनी केली आहे.
एका युवतीच्या संशयास्पद मृत्युप्रकरणी मंत्र्यांचे नाव पुढे येणे, त्याची ध्वनिफीत समाजमाध्यमांमध्ये पसरणे, त्यात आवाज असलेली राठोड नावाची व्यक्ती गायब होणे यातून संशयाला वाव मिळतो. पूजा चव्हाण हिच्या मृत्यूची चौकशी पूर्ण होईपर्यंत राठोड यांना मंत्रिपदावरून दूर करावे, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने घेतल्याचे समजते. आगामी अधिवेशनात राठोड प्रकरण अडचणीचे ठरण्याच्या शक्यतेमुळेच त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे मांडण्यात आल्याचे समजते.
राजीनाम्यासाठी दबाव येत असल्यानेच संजय राठोड यांनी बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवीत मोठे शक्तिप्रदर्शन केले होते. समाज आपल्या पाठीशी असल्याचे चित्र निर्माण करून ‘मातोश्री’वर दबाव आणण्याचा प्रकारही संजय राठोड यांना अंगलट येवू शकतो. येत्या सोमवार पासुन सुरु होत असलेले अधिवेशन पाहता आजच्या बैठकीत संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत सत्ताधारी व विरोधक दोन्ही पक्षांची पत्रकार परिषद होणार आहे.