BEED24

किल्ल्यातील भिंतीचे काम प्रगतीपथावर…

किल्लेधारूरः दि.२(वार्ताहर) येथील ऐतिहासिक किल्ल्यातील (Fort) ढासळलेल्या भिंतीचे काम पुन्हा उभारण्यास सुरुवात झाली असून दोन भिंतीचे काम प्रगतीपथावर आहे. या कामावर नुकतीच गडकिल्ले संवर्धन समितीचे माजी सदस्य संकेत कुलकर्णी (Sanket Kulkarni) यांनी भेट देवून कामाची पाहणी केली.

धारूर (Kille Dharur) येथील ऐतिहासीक किल्ल्याच्या डागडुजीसाठी सात कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. सदरील डागडूजीचे काम हे पुरातत्व विभागाने गायत्री कंन्स्ट्रक्शन औरंगाबाद (Aurangabad) या कंत्राटदाराकडून केले होते. काम केल्यानंतर पाच वर्ष देखभाल व दुरुस्तीची जिम्मेदारी ही गुत्तेदाराची होती. परंतु पाच वर्षे पुर्ण होण्या अगोदरच तीन भिंती ढासळल्या. सदरील प्रकरणी आ. प्रकाशदादा सोळंके (Prakash Solanke) यांच्या पासुन थेट सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांच्या पर्यंत तक्रारी करण्यात आल्या. गड किल्ले संवर्धन समितीचे सदस्य संकेत कुलकर्णी (Sanket Kulkarni) यांनीही या प्रकरणात जातीने लक्ष घालून कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. कुलकर्णी यांनी नुकतीच धारुर किल्ल्यास (Kille Dharur) भेट देवून कामाची पाहणी केली. यावेळी अनेक किल्ल्यांमध्ये तुफानी वेगाने संवर्धन कार्य झाले. किल्ल्यांवर (Fort) कामे झाली, हा आनंदाचा भाग आहे. पण कुठलेही अवशेष परत पूर्वीसारखे बांधून काढायच्या आधी त्यांच्या सद्यस्थितीचा, मूळ वास्तु वैशिष्ट्यांचा अभ्यास करणे आवश्‍यक असते. अनेक किल्ल्यांवर (Fort) संवर्धनकामे करताना आणि सरधोपट पाथ-वेज्‌, दगडी फरसबंदी बांधताना तिथे गाडलेल्या अवशेषांना चिणून टाकण्याचे काम पुष्कळ ठिकाणी झाले. हे होणार नाही, याकडे आपण जागरुकतेनं लक्ष दिलं पाहिजे. या गोष्टी वेळीच लक्षात आणून दिल्या पाहिजेत असे मत व्यक्त केले. करण्यात येत असलेल्या नवीन कामाबाबत काही सुचना करुन समाधान व्यक्त केले. यावेळी पुरातत्व खात्याचे अभियंता नितिन चारुडे, पत्रकार राम शिनगारे, अनिल महाजन, सय्यद शाकेर, योगेश पायघन, श्रीकांत बोरुडे आदी उपस्थित होते.

Exit mobile version