BEED24

Heavy Rain Dharur नदीच्या पुरात वाहुन गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला.

किल्लेधारुर दि.30 अॉगस्ट – Heavy Rain Dharur जोरदार अतिवृष्टीत तालुक्यातील वाण नदीला पुरात दि.26 रोजी पाण्याचा अंदाज न आल्याने पुलावरुन वाहून गेल्यामुळे दोघांना जीव गमवावा लागला आहे. यातील अंबाजोगाईहून धारुरकडे येत असताना अनिल बाबुराव लोखंडे (वय 26) हा तीनचाकी रिक्षासह आवरगाव येथील वाण नदीच्या पुलावरून वाहून गेला होता. गेली तीन दिवस ग्रामस्थ व प्रशासन त्याचा शोध घेत होते. आज दि.30 शनिवारी अथक प्रयत्नानंतर त्याचा मृतदेह सापडला.

गेल्या चार दिवसांपुर्वी तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे वाण नदीला पुर आला. वाण नदीवरील आवरगाव व अंजनडोह येथील पुल पाण्याखाली गेले होते. बुधवारी रात्री रुईधारुरहुन अंजनडोहकडे धारुर येथील आडत व्यापारी नितिन शिवाजीराव कांबळे (वय 42) हे रात्री आठच्या सुमारास आपल्या टाटा कंपनीच्या झेस्ट चारचाकी वाहनाने जात असताना पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्यामुळे वाहनासह वाहुन गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बंधाऱ्या जवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. तर दुसरीकडे रात्री बाराच्या सुमारास अंबाजोगाईहून तीन चाकी रिक्षाने धारुरकडे येणाऱ्या अनिल बाबुराव लोखंडे (वय 26) हा तरुण आवरगाव येथील वाण नदीवरील पुलाच्या पाण्याचा अंदाज आला नसल्याने रिक्षासह वाहुन गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी रिक्षाचा शोध लागला मात्र तरुणाचा शोध गेली तीन दिवस सुरुच होता. शोधकार्यासाठी धारुर येथील अग्निशामक, बीड व छत्रपती संभाजीनगर येथील बचाव पथक बोलावण्यात आले होते. नायब तहसीलदार सुरेश पाळवदे व सहाय्यक पोलिस निरिक्षक देवीदास वाघमोडे आपल्या पथकासह बचाव कार्यावर होते. तीन दिवसानंतर आज दि.30 शनिवारी सकाळी अग्निशामक व छत्रपती संभाजीनगर येथील पथकाला अनिल लोखंडे यांचा मृतदेह नदीवरील दुसऱ्या बंधाऱ्याजवळ झुडपात अडकलेल्या अवस्थेत आढळून आला. प्रशासनाने मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी धारुर ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे.

 

Exit mobile version