मुंबई दि.30 मार्च – महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, रुग्णसंख्येत घट होत नसल्याने राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार अशा चर्चा सुरु आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊनची तयारी करण्याचे आदेश मुख्य सचिवांना दिले आहेत. यानंतर संभाव्य लॉकडाऊनला मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागणार आहे. काल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही लॉकडाऊनला उघडपणे विरोध दर्शविला आहे.
(Lockdown in the state; But opposition to the lockdown grew.)
देशभरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एकट्या महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. कोरोनाविषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह प्रशासनाकडून वेळोवेळी केले जात आहे. मात्र, नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याचे वाढलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. सध्या अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन (lockdown) लावण्यात आले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. गतवर्षीच्या लॉकडाऊन मधून सावरत असताना पुन्हा लॉकडाऊनला सामोरे जाण्याची तयारी लोकांत नसल्याचे दिसत आहे.
यापुर्वी लॉकडाऊन (lockdown) लावण्यात आलेल्या बीड जिल्ह्यात नेत्यांनी विरोध दर्शवला होता तर दोन तरुणांनी थेट आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. काल नांदेडमध्ये पारंपारिक उत्सवात लॉकडाऊनचा अडथळा आल्याने थेट पोलिसांवर जमावाने हल्ला केल्याची घटना घडली. तर उद्या पासुन औरंगाबाद येथे लॉकडाऊन सुरु होत आहे. या लॉकडाऊनला थेट विरोध करत औरंगाबादचे खा. इम्तियाज जलील यांनी तीव्र विरोध करुन भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे.
३१ मार्च रोजी औरंगाबाद शहरात लॉकडाऊनच्या विरोधात खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी पैठणगेट येथून दुपारी तीन वाजता भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्याची घोषणा रविवारी पत्रकार परिषदेत केली. या मोर्चाला कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनीही समर्थन दिले असून तेही समर्थकासह या मोर्चात सहभागी होत आहेत. काल माध्यमासमोर बोलताना भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लॉकडाऊन हा पर्याय नसुन भाजपा लॉकडाऊनला राज्यभर विरोध करणार असल्याचे जाहीर केले.
अगोदरच कोरोनाच्या काळात आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. जनसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. यामुळे आता लॉकडाऊनला सर्वसामान्य लोकांपासून विविध पक्षाच्या नेत्यांनी थेट विरोध सुरु केला आहे. ऐवढेच नव्हे तर सत्ताधारी महाविकास आघाडीतही लॉकडाऊन बाबत मतमतांतर असल्याचे दिसुन येत आहे. या विरोधात आता राज्य सरकार कोणती भुमिका घेणार याकडे आता लक्ष लागले आहे.