BEED24

जबाबदारी ओळखून नियमांचे पालन करा- अजित पवार; पहा काय आहेत नवीन निर्बंध

बारामती/मुंबई दि.16 मार्च – राज्यात कोरोना व्हायरसचा (Corona virus) संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोरोनाचा उद्रेक टाळण्यासाठी सर्वांनी काळजी घ्या. नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून नियमांचे पालन करावे. प्रशासनानेही आवश्यक सर्व उपाययोजना कराव्यात, असे आवाहन बारामती येथे आयोजित एका बैठकीत केले. दरम्यान, राज्य शासनाने काल नवीन आदेश काढत नवीन निर्बंध (restrictions) जारी केले असून याचे काटेकोरपणे पालन करण्याचे जनतेला आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केले आहे.

(Recognize responsibility and follow the rules- Ajit Pawar; See what the new restrictions are)

बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना केल्या. ते म्हणाले, कोरोना व्हायरसचा संसर्ग (Corona virus) रोखण्यासाठी सर्वांनी गांभीर्याने प्रयत्न करावेत. मास्क, सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी तातडीने उपाययोजना आखाव्यात. लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमात गर्दी होणार नाही, यावर पोलिसांनी लक्ष ठेवावे. तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची संख्या वाढवावी. वैद्यकीय साधनसामग्रीची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन
लग्न समारंभ, सामाजिक कार्यक्रम आदी ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. तसेच नागरिकांनीदेखील स्वयंशिस्तीने गर्दी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सुरक्षित अंतर, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे या कोरोना प्रतिबंध नियमांचा वापर नागरिकांनी करावा, त्यामुळे कोरोनाला आळा बसू शकतो. यामुळे लॉकडाउन टाळण्याकरिता नागरिकांनी कोरोना निर्बंधांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केले आहे.

असे आहेत नवीन निर्बंध
राज्य सरकारने पुन्हा एकदा निर्बंध (restrictions) अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला असून कोरोनाबाबतची नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. ३१ मार्चपर्यंत सिनेमागृह, हॉटेल्स यांना ५० टक्के क्षमतेनेच सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सिनेमागृह, हॉटेल्समध्ये मास्क न लावता प्रवेशही देण्यात येणार नाही. तसेच शासकीय, सामाजिक, धार्मिक सभांनाही बंदी घालण्यात आली आहे. विवाहसोहळा जास्तीतजास्त ५० लोकांच्या उपस्थितीत पार पडू शकणार आहे. तर अंत्यविधीला २० जणांनाच उपस्थित राहण्याची परवानगी आहे.

त्याचप्रमाणे मेडिकल आणि अत्यावश्यक सेवा वगळता ऑफिसेस ५० टक्के क्षमतेनेच सुरु ठेवता येणार आहेत. वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देण्याचे आवाहनही सरकारकडून करण्यात आले आहे. धार्मिक स्थळांवर तासाला उपलब्ध जागेचा अंदाज घेऊन गर्दी होणार नाही अशा पद्धतीनेच भाविकांना प्रवेश देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत हे निर्बंध घालून दिले आहेत.

Exit mobile version