BEED24

आता जालन्यात निर्बंध; हॉटेल, व्यायामशाळा पूर्णतः बंद तर लग्नासाठी 20 लोकांनाच राहणार परवानगी.

जालना दि.11 मार्च – जालना (Jalna) शहरासह जिल्ह्याला कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे (Collector Ravindra Binwade) यांनी निर्बंध वाढविले आहेत. दि. 13 मार्च ते 31 मार्चपर्यंत शहरातील सर्व हॉटेल, जीम, व्यायामशाळा पूर्णतः बंद राहतील. तर लग्न कार्यासाठी केवळ 20 लोकांच्या उपस्थितीचे बंधन टाकण्यात आले आहेत. नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने सायंकाळी सात वाजेनंतर बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी बिनवडे यांनी बुधवार दि.10 रोजी दिले आहेत.
(Restrictions on burning now; The hotel and gym are completely closed and only 20 people are allowed to stay for the wedding.)

मराठवाड्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा (Corona Positive) आकडा वाढत चालला आहे. तसतसे विविध जिल्ह्यात निर्बंध लावली जात आहेत. औरंगाबाद, परभणी, बीड, उस्मानाबाद नंतर आता जालन्यात निर्बंध वाढवण्यात आली आहेत. जालना शहरासह जिल्ह्यात कोरोना रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. विशेष करून जालना शहरात दररोज कोरोना बाधित (Corona Positive) आढळत आहेत. यामुळे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे (Collector Ravindra Binwade) यांनी दि.10 बुधवारी नवीन आदेशाद्वारे जिल्ह्यातील निर्बंध वाढविले आहेत.

जालना शहर व जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दि. 13 मार्चपासून ते दि. 31 मार्चपर्यंत जालना (Jalna) शहरातील सर्व हॉटेल, खानावळ, चहाचे हॉटेल, बार, रेस्टॉरंट पूर्णतः बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, पार्सल सुविधेला मुभा देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील किराणा, भाजीपाला, दूध, औषधालय व अन्य जीवनावश्यक आस्थापना वगळून इतर सर्व आस्थापना सायंकाळी सात वाजेनंतर बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सर्व दुकानदारांनी आपल्या कामगारांची दर पंधरा दिवसांना कोरोना चाचणी करून त्याचा अहवाल जवळ ठेवणे बंधनकारक राहणार आहे. तसेच दुकानांमध्ये गर्दी होणार नाही याची खबरदारीही घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील सर्व व्यायामशाळा व जीम पूर्णतः बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील मंगल कार्यालय हे केवळ लग्नसमारंभासाठी सुरू राहणार असले तरी केवळ वीस लोकांच्‍या उपस्‍थितीत लग्नसोहळा पार पाडणे बंधनकारक करण्यात आले आहे.

मंगल कार्यालयात सॅनिटायझर, मास्‍कसह, शारीरिक अंतराचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन केल्‍यास लग्नसोहळा आयोजकासह मंगल कार्यालय मालकावर दंडात्‍मक कारवाई केली जाणार आहे. दरम्‍यान, धार्मिक सभा, राजकीय सभा, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रम फेरी, मिरवणुका, आंदोलने, मोर्चे, धरणे आदींना दि.31 मार्चपर्यंत मनाई आदेश जिल्हाधिकारी बिनवडे यांनी दिले आहेत.

Exit mobile version