BEED24

घोटाळेबाज उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील निलंबित; धारुर प्रकरणी गुन्हा दाखल होणार का?

बीड दि.15 जानेवारी – बीड जिल्ह्यात देवस्थान आणि वक्फ बोर्डच्या शेकडो एक्कर जमिनी लाटल्याचा प्रकार समोर आला होता. यामध्ये तत्कालीन उपजिल्हाधिकारी एन.आर. शेळके आणि प्रकाश आघाव पाटील यांच्यावर गुन्हा देखील झालेला आहे. राज्य शासनाने शेळके यांच्यावर यापुर्वीच निलंबनाची कारवाई केले असून दुसरे घोटाळेबाज उपजिल्हाधिकारी (Deputy Collector) प्रकाश आघाव पाटील याच्यावर काल (दि.14) निलंबनाचे (suspension) आदेश काढले आहेत.

(Scam Deputy Collector Prakash Aghav Patil suspended; Will there be a case in Dharur case?)

बीड (Beed) जिल्हाधिकारी कार्यालयातील भु-सूधारचे तत्कालीन उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील याने अनेक जमिनी खालसा केल्याच्या तक्रारींचा पाऊस झाला होता. त्यामुळे चौकशी करण्यात येत होती. त्याच्यावर आष्टीत (Ashti) 3 तर बीडमध्ये 1 गुन्हा देखील दाखल झाला होता. तत्पूर्वी त्याची बदली करण्यात आलेली होती. परंतु त्यानी मध्यंतरी बीडला रूजू होण्याचा प्रयत्न केला, असता जिल्हाधिकार्‍यांनी त्याला रूजू करून घेण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला.

या सर्व घडामोडीनंतर अखेर प्रकाश आघाव पाटील याच्या निलंबनाचे आदेश राज्य शासनाने (State Government) काढले असून त्याच्यावर जमीन खालसा प्रकरणात अनियमितता केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील हजारो एक्कर जमिनी भूखंड माफियांनी आपल्या घशात घातली असून याची देखील चौकशी होऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

काय आहे प्रकरण? 
बीड शहरातील प्रसिद्ध शहेनशाहवली दर्ग्याला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला. दर्ग्याची तब्बल 405 एक्कर जमीन बनावट दस्तऐवज बनवून, महसूलमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने भूमाफियांनी लाटली आहे. याप्रकरणी बीडमधील महसूलच्या उपजिल्हाधिकारीसह 15 जणांविरोधात शिवाजीनगर पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

यामुळे पुन्हा एकदा महसूल मधील भूमाफियांचे रॅकेट उघड झाले. जिल्हा वक्क बोर्ड (Waqf Board) अधिकाऱ्याच्या फिर्यादीवरून, मुस्लिम धार्मिक स्थळ दर्गा, जमीन गैर व्यवहार प्रकरणी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव याच्यासह,15 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह भुमिअभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. खिदमतमास जमीन असताना बनावट दस्तावेज बनवून उपजिल्हाधिकारी आघाव याने मदतमास करून खालसा केली.

शहरातील प्रसिद्ध शहेनशाहवली दर्गाची 796 एक्कर 37 गुंठे जमीनी पैकी 405 एक्कर 5 गुंठे जमीन, बनावट दस्तावेज तयार करून खालसा केलीय. भूमाफियांनी यामधील काही जमिनीवर प्लॉटिंग करून जमीन विकली असल्याचं देखील समोर आलं आहे. दरम्यान, या जमिनीची किंमत कोट्यवधीच्या घरात असून या जमिनीमधून राष्ट्रीय महामार्ग गेल्याने, तब्बल 15 कोटी रुपयांचा मावेजा शासन दरबारी पडून आहे. त्यामुळं आरोपी भूमाफियांनी हा मावेजा उचलण्यासाठी नामी शक्कल लढवली असल्याचं तक्रारीत म्हटले आहे.

यासंदर्भात मूळ तक्रार सादेक बाबामिया इनामदार यांनी केली होती. या प्रकरणातील दोषींवर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणी महसूलमधील बड्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल झाले होते. आष्टी तालुक्यात 3 गुन्हे दाखल झाले असतांना 4 था गुन्हा देखील दाखल आहे. याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली असून कसुन चौकशी सुरु आहे.

धारुरच्या प्रकरणात गुन्हा दाखल होणार का?
धारुर (Dharur) शहरातही निलंबित उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांनी एका मशिदीच्या इनाम जमीन प्रकरणी बेकायदेशीर जमीन खालसा केल्याची तक्रार आहे. याप्रकरणी तक्रारदारांनी जिल्हाधिकाऱ्यांसह थेट वक्फ मंत्र्यांच्याकडे निवेदन दिले असून काहींनी न्यायालयात धाव घेतलेली आहे.

या प्रकरणात नियम धाब्यावर बसवून तहसीलदारांसह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जमीन खरेदी विक्री व्यवहार केला आहे. यामुळे याप्रकरणी गुन्हे नोंद होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

Exit mobile version