बीड दि.16 मे – अवघ्या पंधरा दिवसात बीड जिल्ह्यात कोरोनाने साडेतीनशे बळी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका वृत्तपत्राच्या हवाल्यानूसार जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यात कोरोना संसर्गाचा उच्चांक गाठला असतानाच मे महिन्यात मृत्यूचा टक्का देखील वाढला आहे. एप्रिलच्या महिनाभरात जिल्ह्यात 409 मृत्यू झाले होते मात्र मे महिन्यात पहिल्याच पंधरवाड्यात तब्बल साडेतीनशे कोरोना बळी (Corona Death) गेले आहेत. याशिवाय नॉन covid-19 यामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या वेगळीच आहे. आज दि.16 मे रोजी 45 मृत्यूची नोंद करण्यात आली. यात आजचे 9 तर प्रलंबित असलेले 36 मृत्यू आहेत.
(Shocking …. 395 corona victims in Beed district in fortnight; 45 deaths recorded today.)
बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या वाढत आहे. यात लोक अजूनही कोरोनाचा (Covid-19) आजार अंगावर काढत आहेत. त्यामुळे रुग्ण दवाखान्यात दाखल होतानाच गंभीर होऊन दाखल होत आहेत. मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. रुग्ण आजार अंगावर न काढता वेळेवर दवाखान्यात येण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोना संसर्ग (Corona Infection) आता ग्रामीण भागात पोहोचलेला आहे.
परिस्थिती गंभीर होत असताना अजूनही ग्रामीण भागात लोक आजार अंगावर काढत आहेत. दवाखान्यात दाखल होईपर्यंत त्यांची प्रकृती अधिकच बिघडलेली असते. उपचार सुरू झाले तरी त्याला प्रतिसाद न देता रुग्ण दगावत आहेत किंवा उपचाराची संधीदेखील न मिळताच रुग्ण दगावत आहेत. महिन्यात अवघ्या पंधरा दिवसात कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) आलेल्या साडेतीनशे व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.
एप्रिलच्या महिनाभरात जिल्ह्यात 409 मृत्यू नोंदविले गेले होते. त्या तुलनेत मे महिन्यातील आकडे हे मृत्यूचे प्रमाण दुपटीने वाढल्याने दाखवणारे आहेत. त्यात जे मृत्यू नोंदविण्यात आले आहेत त्या साडेतीनशे पैकी तब्बल 114 मृत्यू हे अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात तर 110 मृत्यू बीडच्या जिल्हा रुग्णालयात झाले आहेत. या महिन्यात जिल्हा रुग्णालयात मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढले असून लोखंडी सावरगावच्या रुग्णालयात देखील तुलनेत मागच्या पेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत.
जिल्ह्यात नोंदविल्या गेलेल्या 409 मृत्यू पैकी जवळपास निम्मे म्हणजे 191 मृत्यू एकट्या स्वामी रामानंद तीर्थ अंबाजोगाई रूग्णालयात झाले आहेत. बीड जिल्हा रुग्णालयात 106 मृत्यू झाले होते. ज्या रुग्णांना वेळेत उपचार मिळाले ते नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे झालेले आहेत. उपचाराला सुरुवात झाली तर बावीस-तेवीस स्कोर असलेले रुग्ण देखील बरे झाले आहेत. त्यामुळे मृत्यूचा टक्का वाढत असताना आता रुग्णालय आणि त्यांच्या नातेवाईकांनी वेळेत दवाखान्यात नेण्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
आज जिल्ह्यात दि.16 मे रोजी पुन्हा 45 मृत्यूची नोंद झाली आहे. यात आजचे 9 तर प्रलंबित असलेले 36 मृत्यू आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत एकुण 1423 मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्ह्याचा मृत्यू दर 1.91 टक्के आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने जाहिर केली आहे.