किल्लेधारूर दि.२०(वार्ताहर) गेवराई, वडवणी, धारुर व अंबाजोगाई या चार तालुक्याला जोडणाऱ्या पाडळसिंगी ते लोखंडी सावरगाव या राज्य रस्त्याच्या कामासाठी ४२५ कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती या रस्त्यासाठी गेली १५ वर्ष प्रयत्न करणारे महाराष्ट्र पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष सदानंद खिंडरे यांनी दिली.
हैदराबाद व औरंगाबाद मधील अंतर या रस्त्यामुळे कमी होणार असून लातूर, आंबेजोगाई, किल्ले धारूर, वडवणी, पिंपळनेर, गेवराई या गावांचा विकास होणार आहे. सदर रस्त्याला ५ राष्ट्रीय महामार्गाला जोडले जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातला हा रस्ता देशासाठी व राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या रस्त्यासाठी गेवराई चे आ. लक्ष्मण पवार यांनी विशेष प्रयत्न केले. महाराष्ट्र पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष सदानंद खिंडरे यांच्या अथक परिश्रमातून मंजुरी मिळत सदरील रस्त्यास ४२५ कोटी शासनाकडून मंजूर करून घेण्यात आले आहेत. सदरील प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्रकल्पा अंतर्गत एशियन डेव्हलपमेंट बँके (एडिबी) मार्फत होणार आहे. नुकतेच राज्य रस्ता बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली असून ८४ कि.मी. रस्त्याचे डिपीआरचे काम सुरु असल्याची माहिती मिळाली. याबाबत येथील बांधकाम विभागाशी संपर्क केला असता अधिकृत माहिती मिळु शकली नाही.