मुंबई दि.20 अॉगस्ट – कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. राज्याची दैनंदिन रुग्ण संख्या अगदी सहा हजारांच्या आत आली आहे. राज्यातील नंदूरबार जिल्हयात एकही कोविडचा (Covid-19) सक्रिय रुग्ण नाही. सहा जिल्ह्यातील सक्रीय रुग्ण संख्या दहा पेक्षा कमी तर आठ जिल्ह्यातील रुग्ण संख्या शंभरपेक्षा कमी आहे. परंतू अद्यापही राज्यातील सात जिल्ह्याची रुग्ण संख्या अधिक असल्याने महाराष्ट्राची चिंता वाढली आहे.
(These seven districts raised the concern of Maharashtra ….)
काय आहे जिल्ह्यांची स्थिती…
10 पेक्षा कमी रुग्ण …
राज्यातील धुळे, वाशिम, यवतमाळ, भंडारा, वर्धा, गोंदिया या सहा जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या दहापेक्षाही कमी आहे.
शंभरपेक्षा कमी रुग्ण…
राज्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्हयात सक्रिय रुग्णसंख्या 100 पेक्षा कमी आहे.
जास्त रुग्ण संख्या असलेले जिल्हे..
सद्यस्थितीत जास्त रुग्णसंख्या असलेल जिल्हे सातारा, सांगली, अहमदनगर, पुणे, उस्मानाबाद, सोलापूर, सिंधुदुर्ग.
राज्याचा साप्ताहिक सरासरी रुग्णबाधेचा दर (Positivity rate) 2.44 टक्के इतका आहे. राज्यात गत काही दिवसात कोल्हापूर, रत्नागिरी या शहरातील रुग्णवाढीचा दर हा चिंताजनक होता. तथापि, आजघडीला दिलासादायक बाब म्हणजे या जिल्ह्यांचा साप्ताहिक सरासरी रुग्णवाढीचा दर 2.44 टक्के यापेक्षाही कमी आलेला आहे.
दिनांक 17 ऑगस्ट 2021 अखेरची सक्रिय रुग्णसंख्या आजपर्यंत कोरोना बाधित (Corona Positive) झालेले एकूण रुग्ण – 64 लाख 1 हजार 213. बरे झालेले रुग्ण – 62 लाख 1 हजार 168. एकूण मृत्यू – 1 लाख 35 हजार 255 सक्रिय रुग्ण संख्या – 61 हजार 306. रुग्ण बरे होण्याचा दर – 96.87 टक्के.
लसीकरण (vacccination) सद्यस्थिती
राज्यात आजघडीला पाच कोटी सात लाखांपेक्षा अधिक कोविड प्रतिबंधक लसीचे (Corona vaccine) डोस देण्यात आलेले आहेत. राज्यातील 45 वयोगटावरील जवळपास 50 टक्के नागरीकांना किमान एक डोस देण्यात आलेला आहे. 18 ते 44 वयोगटातील जवळपास 25 टक्के नागरिकांना किमान एक डोस देण्यात आलेला आहे.
राज्यातील एक कोटी तेहतीस लाख सात हजार नागरीकांना कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा देण्यात आलेल्या आहेत हा देशातील उच्चांक आहे.तसेच दिनांक 14 ऑगस्ट 2021 रोजी राज्यात एकाच दिवशी नऊ लाख चौसष्ट हजार नागरीकांचे कोविड लसीकरण (vacccination) करण्यात आले आहे. हा देखील महाराष्ट्रातील उच्चांक आहे.
राज्य नागरीकांच्या आरोग्याला प्राधान्य देत आर्थिक गतीविधींना चालना देण्याचाही प्रयत्न करीत आहे. यासाठी ब्रेक द चेन (Break the chain) अंतर्गत काही निर्बंध (restrictions) शिथील करण्यात आलेले आहेत. नजीकच्या काळात येणारे विविध सण व उत्सव लक्षात घेता गर्दी व्यवस्थापनासाठी नागरीकांचे सहकार्य अपेक्षित आहे. तसेच कोविड प्रतिबंधक उपाययोजना जसे मास्कचा वापर, हाताची स्वच्छता व सुरक्षित शारिरीक अंतराचे पालन करणे आवश्यक आहे. याचबरोबर जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होऊन नागरीकांचा कोविड प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासाठी नागरिकांनी भविष्यात देखील असेच सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.