वृत्त वाहिनीचे (TV) पत्रकार स्व. पांडुरंग रायकर कुटूंबियांवर संकट
मुंबई: दि.१४- चार महिन्यापुर्वीच एका वृत्त वाहिनीचे (TV Reporter) पत्रकार पांडुरंग रायकर (Pandurang Raikar) यांचे कोरोनानं (corona) निधन झाले. चार महिने लोटले नसतानाच आता त्यांच्या वडिल लक्ष्मण रायकर यांचे देखील कोरोनानं निधन झाल्याने एका पत्रकाराचं सारं कुटुंब उघडं पडलं असल्याची दुर्दैवी घटना घडली. अद्यापही सरकारनं कोरोनामुळे निधन झालेल्या पत्रकारांच्या कुटूंबियांना मदत देण्याबाबत कोणतीच ठोस भूमिका घेतली नसल्याने मराठी पत्रकार परिषदेने संताप व्यक्त केला आहे.
पांडुरंग चे वडिल लक्ष्मण रायकर यांना कोरोनाची (corona) लागण झाल्यावर त्यांना अहमदनगर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र कोरोनाशी लढताना काल सकाळी त्यांचं निधन झालं. रायकर कुटुंबावर चार महिन्यात दुसरा आघात झाला. लक्ष्मण रायकर हे श्रीगोंदा तालुक्यात हंगेवाडी येथे भाजीचा व्यवसाय करीत होते. त्यांच्या मागे पत्नी, सून आणि तीन मुली आहेत. त्यांच्या निधनानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. पांडुरंग रायकर (Pandurang Raikar) यांच्यावर योग्य उपचार न झाल्यानं त्याचा बळी गेला. तत्पूर्वीच आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनीच कोरोनानं पत्रकाराचं निधन झाल्यास त्याच्या कुटुंबियांना पन्नास लाख रूपयांची मदत करण्याची घोषणा केली होती. मात्र राज्यात जवळपास पन्नास पत्रकारांचे बळी कोरोनानं घेतल्यानंतरही एकाही पत्रकाराच्या नातेवाईकांना सरकारनं मदत केली नाही. पांडुरंग रायकर यांच्या घरातील दोन कर्ते पुरूष गेले आहेत. सरकारने आतातरी या कुटुंबाला तातडीने मदत करावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने एका पत्रकाव्दारे केली आहे. पत्रकावर एस.एम.देशमुख (S.M. Deshmukh), विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी, महिला संघटक जान्हवी पाटील, राज्य प्रसिध्दी प्रमुख अनिल महाजन, नगर विभागीय सचिव मन्सूरभाई, आदिंच्या स्वाक्षर्या आहेत. पांडुरंग रायकर (TV Reporter) ज्या चॅनलसाठी काम करीत होता त्या टीव्ही (TV) चॅनलनं देखील हात वर केले. मराठी पत्रकार परिषदेने पाठपुरावा केल्यानंतरही चॅनलच्या मॅनेजमेंटने रायकर कुटुंबाला कोणतीही मदत केली नाही हे विशेष.