पुणे दि.9 एप्रिल – महाराष्ट्रात सध्या उन्हाचा चटका वाढत असताना आज गुढीपाढव्याच्या म्हणजेच हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रातील अनेक भागात वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांचा यात समावेश आहे. तर विदर्भातील जवळजवळ 4 जिल्ह्यांत गारपीट होण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांत तीव्र उकाडा, कडक उन्हाचा चटका तर सध्याच्या परिस्थितीत संमिश्र वातावरण दिसून येत आहे. यातच हवामान विभागाने शुक्रवार पर्यंत अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवला आहे. आज विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, वाशिम, बुलढाणा, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती व यवतमाळ या अकरा जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड आणि परभणी या चार जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच 12 एप्रिलपर्यंत विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील पाच ते सात दिवस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली. विदर्भात वादळी वारे, वीजांचा कडकडाटासह गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.