BEED24

महाराष्ट्रात लॉकडाऊनची का आहे गरज ? …. पहा सत्यपरिस्थिती .

मुंबई दि. 22 एप्रिल – महाराष्ट्रात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन (Break The Chain) मोहिमे अंतर्गत लॉकडाऊनचा (lockdown) निर्णय घेण्यात आला आहे. आज रात्री 8 वाजेपासून लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार आहे. दरम्यान, राज्यातील जिल्हा अंतर्गत वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील चिंताजनक स्थिती सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असला तरी एक गंभीर भाकित या परिस्थितीबाबत करण्यात आलं आहे. महाराष्ट्र (Maharashtra) सरकारच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या या भाकितानुसार, कोव्हिड-19 (Covid-19) चं खरं भयानक स्वरूप येत्या 10 दिवसांत समोर येऊ शकत. म्हणून राज्य सरकारकडून राज्यात 1 मेपर्यंत कडक लॉकडाऊनचा (lockdown) निर्णय घेण्यात आला आहे.

(Why is there a need for lockdown in Maharashtra? …. See the facts.)

राज्य शासनाने ब्रेक द चेन (Break The Chain) मोहिमे अंतर्गत अनेक कठोर निर्बंध लादूनही नागरीकांत गांभिर्य नसल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यात आपल्या जवळपास घडणाऱ्या मृत्यूच्या तांडवानंतरही यात परिणाम दिसत नाही. उलट माध्यमातून येणाऱ्या अशा वृत्तांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यात धन्यता मानली जात आहे. तर जीवनावश्यक सेवांच्या नावावर गर्दी करणाऱ्यांना जीवनावश्यक सेवेपेक्षा जीवनच आवश्यक असल्याचा विसर पडला आहे. प्रत्यक्षात मात्र लोकांना आवर घालण्यात सर्वांनाच अपयश आलेले आहे. अशात सार्वजनिक आरोग्य खात्याच्या भाकितानुसार देशातील सर्वात जास्त बाधित रुग्ण असलेल्या महाराष्ट्रात ‘सक्रिय रुग्ण’ (Active patients) मोठ्या प्रमाणात वाढू शकतात. बुधवारच्या आकडेवारीनुसार पुण्यात सध्या 1, 21,282 अॅक्टिव्ह केसेस आहेत, तर मुंबईमध्ये ही संख्या 83, 450 आहे. ही आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान अशी शक्यता वर्तवली जात आहे की, महाराष्ट्रात (Maharashtra) पुण्यामध्ये 1 लाख 90 हजारांच्या आसपास तर मुंबईत 1 लाख 50 हजारांच्या आसपास अॅक्टिव्ह रुग्ण (Active patients) हे मे च्या पाहिल्या आठवड्यात असू शकतील. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या दुसऱ्या कोरोना लाटेमधील कोरोना पॉझिटीव्ह (Corona Positive) रुग्णांची सर्वोच्च संख्या पाहायला मिळेल, असा अंदाज राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने बांधला आहे.

राज्यसरकारच्या या अंदाजानुसार ठाण्यात सध्या 78, 473 ‘सक्रिय रुग्ण आहेत, ही रुग्णसंख्या अंदाजे 1 लाख 23 हजार पर्यंत जाऊ शकते. नागपूरमध्ये अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 80,155 असून मे च्या पहिल्या आठवड्यात ही संख्या 1 लाख 24 हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.यामुळे या चार सर्वात बाधित ‘हॉटस्पॉट्स’मधील एकूण आरोग्य पायाभूत सुविधांवर गंभीर ताण पडण्याची शक्यता आहे. परंतु मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूरचा अपवाद वगळता क्वारंटाइन सेंटर्समध्ये मूलभूत आयसोलेशन बेडचीही मोठ्या प्रमाणात कमतरता भासण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या लाटेच्या सगळ्यात बाधित असणाऱ्या वेळी म्हणजेच मे महिन्यात मुंबईत 3900 अतिरिक्त आयसोलेशन बेड (Isolation bed) असणे अपेक्षित आहे. पण पुणे, नागपूर आणि ठाणे येथे आयसोलेशन बेडची मोठी कमतरता भासणार आहे. याचा अर्थ असा होऊ शकतो की अनेक ‘सक्रिय रुग्णांना’ घरी राहण्यास भाग पाडले जाऊ शकते किंवा आयसोलेशन बेड (Isolation bed) उपलब्ध होईपर्यंत प्रवेशात उशीर होऊ शकतो. ज्यामुळे रुग्ण आणि इतरांना धोका निर्माण होण्याची भीती आहे. आरोग्य व्यवस्थेवर सध्याच आलेल्या ताणामुळे पुढील पंधरवड्यात गंभीर परिस्थिती निर्माण होत असतानाही चारही शहरांमध्ये ऑक्सिजन बेड (Oxygen bed), आयसीयू बेड (ICU bed) आणि व्हेंटिलेटरसारख्या इतर आवश्यक वस्तूंची मोठी कमतरता दिसून येईल.

मुंबईत ऑक्सिजन बेड (6500), आयसीयू बेड (1500) आणि व्हेंटिलेटर्स (150), पुण्यात ऑक्सिजन बेड (13,120), आयसीयू बेड (2250) आणि व्हेंटिलेटर्स (600) ची कमतरता भासणार आहे. म्हणूनच एकाबाजूला मुंबईत कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची संख्या मागच्या आठवड्याभरात कमी होताना पाहायला मिळाली असली तरी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आकडेवारीबाबत अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली. कोरोनाबधित रुग्णांची आकडेवारी स्थिरावली असली तरी ती पूर्ण नियंत्रणात आली असं म्हणता येणार नाही अशी ती प्रतिक्रिया होती.

त्याचप्रमाणे ठाणे आणि नागपूरमध्ये ऑक्सिजन बेड (Oxygen bed), आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर्सची (Ventilators) मोठ्या प्रमाणात कमतरता असेल. इतर 32 जिल्ह्यांमध्येही ‘सक्रिय बाधितांची’ संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने या पायाभूत सुविधांची उपलब्धता राज्यभर अत्यंत अपुरी पडेल. मुंबई, पालघर, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव आणि अमरावती वगळता उर्वरित 29 जिल्ह्यांमध्ये ‘सक्रिय प्रकरणां’साठी पुरेसे आयसोलेशन बेड नसतील.

पालघर, सांगली, कोल्हापूर, जळगाव, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि गडचिरोली वगळता ऑक्सिजन बेडच्या स्थितीबाबत उर्वरित 28 जिल्ह्यांतील रुग्णांना ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा झाल्यामुळे अनेकांच्या जीवावर बेतू शकतं. आयसीयू बेडचा (ICU bed) विचार केला तर रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, नांदेड, अमरावती, अकोला, वॉशम आणि बुलढाणा वगळता 25 जिल्हे आयसीयू बेडचा कमी पुरवठा होत असल्याची तक्रारी मोठ्या प्रमाणात येऊ शकतील.

व्हेंटिलेटरवरील (Ventilators) उपचाराच्या शेवटच्या टप्प्यावर ही परिस्थिती तितकीच भयानक असू शकते – फक्त पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, जळगाव, धुळे, औरंगाबाद, उस्मानाबाद, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ आणि गडचिरोली या ठिकाणी पुरेशी संख्या असेल. परंतु उर्वरित 18 जिल्ह्यांच्या रुग्णांना पुरेशा संख्येने व्हेंटिलेटरशिवाय मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

सध्याच्या बाधित रुग्णांच्या संख्येला पुरतील असे केवळ 14 जिल्ह्यांमध्ये स्पेअर आयसोलेशन बेड आहेत, परंतु उर्वरित 22 जिल्ह्यांमध्ये ही मागणी सध्याच्या क्षमतेच्या 60 टक्के ते 180 टक्क्यांपर्यंत आहे. आजवर नोंदवलेल्या मृत्यूदराच्या आधारे सरकारच्या अंदाजानुसार, बुलढाणा, अकोला, नंदुरबार, जळगाव आणि नांदेड हे जिल्हे पुढील काही दिवसांत “वॉच” वर असतील.

एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘राज्यात बेड, ऑक्सिजनचा पुरवठा, रेमेडिसीविरची कमतरता हे पाहता आता लॉकडाऊन शिवाय पर्याय नाहीय. कारण 30 एप्रिलपर्यतचा हा सर्वात कठीण काळ राज्यासाठी असू शकतो.’ तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मते, ‘मुंबईतील काही भागांत लॉकडाऊन च्या नियमांना पायदळी तुडवलं जातंय. जर आता कडक लॉकडाऊन केला नाही तर मात्र रुग्ण बाधितांची स्थिती हातांबाहेर जाईल.’

परिवहन मंत्री अनिल परब यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत सध्या राज्याची परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा अंतर्गत बससेवा केवळ अत्यावश्यक सेवेतच करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे जिल्हा बंदी असणार हे त्यांनी  स्पष्ट केले. अतिमहत्वाच्या कामाशिवाय आता बाहेर येण्यास संपुर्ण बंदी असणार आहे.

Exit mobile version