
मुंबई : महाराष्ट्रात दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. जवळजवळ १७ लाख विद्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता होती. अखेर आता ही उत्सुकता संपली आहे. दहावीचा निकाल गतवर्षी पेक्षा यावर्षी सरासरी गुणांमुळे जास्त लागला असल्याची प्रतिक्रिया बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी व्यक्त केली. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर http://mahresult.nic.in/ विद्यार्थी हा निकाल एक वाजता पाहता येणार आहे.
राज्याचा दहावीचा निकाल ९५.३० टक्के लागला आहे. निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. राज्यात ९६.९१ टक्के मुली पास झाल्या आहेत. तर ९३.९० टक्के मुलांनी बाजी मारली आहे. यंदा ३.१ टक्क्यांनी मुलींचा निकाल जास्त लागला आहे. तर कोकण विभागाचा सर्वाधिक तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. मागच्या वर्षी पेक्षा यावर्षी खूप जास्त निकाल लागला आहे. मागच्या वर्षी ७७.१० टक्के निकाल होता. अंतर्गत मूल्यमापन , तोंडीपरीक्षा, कृतीपत्रिका आणि भूगोलाचे सरासरी गुण यामुळे यावर्षी जास्त निकाल लागला, असं मत मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी व्यक्त केलं.