अवैधरित्या भणाऱ्या बाजाराकडे नगर परिषदेची डोळेझाक

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचीही पायमल्ली

किल्लेधारूर दि.७(वार्ताहर) एकिकडे शहरात कोरोनाचे थैमान सुरु असताना दुसरीकडे अवैधरित्या भरणाऱ्या बाजाराकडे नगर परिषद प्रशासन डोळेझाक करत असल्याचे दिसत असुन हनुमान मंदिर, पोस्ट अॉफीस रस्त्यावरील व्यवसायिकांनी कारवाईची मागणी करुनही सदरील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसत आहे. नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांनी धारुरमध्ये नियम न पाळणाऱ्यावर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. मात्र प्रत्यक्षात स्थानिक प्रशासन मात्र कारवाई करण्यास धजावत नसल्याचे दिसत आहे.

शहरात गेली ३६ दिवस दररोज नवीन कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. जिल्हा प्रशासन गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी नवनवीन नियम व सुचना करत असताना स्थानिक पातळीवर सदरील नियम पायदळी तुडवली जात आहेत. तहसील, पोलिस व नगर परिषदेची जबाबदारी असताना संबंधित सर्व यंत्रणा गर्दी नियंत्रणात मात्र सपशेल फोल ठरत आहे. दि.५ रोजी येथील पंचायत समिती सभागृहात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी गर्दी रोखण्या संदर्भात, सोशल डिस्टंट व मास्क वापरण्या बाबत कठोर पाऊल उचलण्याच्या सुचना देवूनही स्थानिक प्रशासन वेळकाढूपणाची भुमिका घेत असल्याचे दिसत आहे. या अवैधरित्या भरणाऱ्या बाजारात मोबाईल चोरीसह जागेवरुन भाजी विक्रेत्यात वाद होत आहेत. या भागातील गाळेधारक, दुकानदार व व्यापाऱ्यांनी नगर परिषदेकडे सदरील भागात मोठी गर्दी होत असुन व्यापाऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत असल्याने तात्काळ बाजार बंद करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. मात्र सदरील निवेदनाची कसलीही दखल नगर परिषदेने घेतली नसल्याचे दिसत आहे. शहरात सोमवार व शुक्रवार हे दोन पारंपरिक बाजार आहेत. सदरील दिवशी बाजारतळावर सोशल डिस्टंटचा व प्रशासनाच्या नियमांचे पालन करणाऱ्या भाजी विक्रेत्यासह इतर व्यवसायिकांना बसण्याची परवानगी द्यावी अशीही मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!