नगरसेवकांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग दक्षता समित्या , प्रभाग निहाय स्थापन
गल्लीतील हालचाली वर ठेवणार लक्ष

किल्लेधारूर दि.१८(वार्ताहर) जिल्हाधिकारी, बीड यांच्या आदेशाने पर जिल्हा किंवा पर राज्यातून आलेल्या व्यक्तींची माहिती देण्यासाठी नगर परीषद, धारूर अंतर्गत नगरसेवकांच्या अध्यक्षतेखाली प्रभाग दक्षता समित्या , प्रभाग निहाय स्थापन करण्यात आलेल्या असून नागरिकांनी दक्षता समित्याशी संपर्क करण्याचे आवाहन नगर परिषदेच्या वतीने प्रभारी मुख्याधिकारी सुहास हजारे यांनी केले आहे.
बाहेर जिल्ह्यातून किंवा राज्यातून आलेल्या व्यक्ती व त्याच्या कुटुंबीयांनी स्वतःला २८ दिवस होम क्वारंटाईन करून घेणे बंधनकारक आहे, याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी नियुक्त समितीवर सोपविण्यात आली आहे. इतर राज्यातून किंवा जिल्हयातून आलेल्या व्यक्ती सह कुटूंबियांनी २८ दिवस कॉरनटाईन पालन केल्याचे न आढळल्यास संबंधितांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल. धारूर शहरातील नागरिकांनी बाहेर जिल्ह्यातून किंवा राज्यातून आलेल्यांची माहिती आपल्या प्रभागातील नगरसेवक किंवा दक्षता समितीतील कोणत्याही सदस्याला द्यावी, धारूर शहरातील प्रत्येक प्रभागातील नगरसेवकां सहीत प्रत्येकी १० समिती सदस्यांचा व समन्वय अधिकाऱ्यांचा मोबाईल नंबर देण्यात येत आहे. होम क्वारंटाईन असलेला व्यक्ती किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्ती त्याच्या गल्ली किंवा कॉलनीमध्ये राजरोसपणे फिरत असल्यास दक्षता समितीला कळविण्यात यावीत. प्रत्येक कुटुंब प्रमुखाने त्यांच्या घरात पर जिल्हा किंवा पर राज्यातून आलेल्या व्यक्तीची माहिती स्वतःहून दक्षता समितीला द्यावी. परजिल्हा व परराज्यातून आलेला व्यक्ती कडून विषाणू चा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा व्यक्तींची माहिती देऊन जिल्हाधिकाऱ्यांचे यांचे आदेशानुसार व आवाहन नुसार बीड जिल्हा प्रशासनाला सहकार्य करा व स्वतःचा व आपल्या कुटुंबियांचा कोरोना संसर्गापासून बचाव करा असे आवाहन प्रभारी मुख्याधिकारी सुहास हजारे यांनी केले आहे.