ऐतिहासिक किल्ल्यातील दुसरी नवीन भिंतही ढासळली…

किल्लेधारूर दि.७(वार्ताहर) शहरातील ऐतिहासिक किल्ल्यात बांधण्यात आलेल्या नवीन भिंती ढासळण्यास सुरुवात झाली असुन दि.७ सोमवारी नवीन बांधलेली दुसरी भिंतही ढासळल्याचे दिसुन आले.
येथील ऐतिहासिक किल्ल्यात २०१३ मध्ये राज्य पुरातत्व विभागाकडून डागडूजी करण्यास सुरुवात झाली होती. सदरील काम गायत्री कन्स्ट्रक्शन औरंगाबाद या खाजगी कंत्राटदाराकडून करण्यात आले. या नवीन कामा पैकी महिनाभरापुर्वीच खारी दिंडी परिसरातील भिंत कोसळली होती. सदरील काम निकृष्ट असल्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्या भेटी दरम्यान नागरिकांनी निदर्शनास आणून दिले होते. तत्पुर्वीही पुरातन खात्याकडे तक्रारी करण्यात आल्या मात्र त्याची कसलीच दखल घेतली नसल्याने अवघ्या चार ते पाच वर्षात नवीन भिंती ढासळू लागल्या असल्याचे दिसत आहे. सदरील नवीन भिंती ढासळत असल्यामुळे कामाचा निकृष्ट दर्जा समोर येत आहे. एकीकडे शेकडो वर्षांपासुन अभेद्य असलेल्या पुरातन भिंती तग धरुन असताना नवीन भिंती पडत आहेत. पुरातत्व विभागाने तात्काळ या कामाची चौकशी करुन निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारावर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस पत्रकार सय्यद शाकेर यांनी यापुर्वीच केली आहे.