कौशल्य विकास विभागामार्फत ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे आयोजन – ना. नवाब मलिक

मुंबईः– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या संकटकाळात राज्यातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास विभागाने पुढाकार घेतला असून सध्याचा लॉकडाऊनचा कालावधी बघता प्रत्यक्ष रोजगार मेळावे घेता येणे शक्य नसल्याने विभागामार्फत आता ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री ना. नवाब मलिक यांनी दिली.
या मोहिमेंतर्गत राज्यात आतापर्यंत एकूण १४ ऑनलाईन व्हर्च्युअल रोजगार मेळावे झाले असून त्यास उद्योजक व उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. ऑनलाईन मेळाव्यां मध्ये एकूण ११५ उद्योगांनी त्यांच्याकडे असलेली १२ हजार ३२२ रिक्तपदे अधिसूचित केली आहेत. यामध्ये २५ हजार ४७ उमेदवारांनी ऑनलाईन सहभाग घेतला व त्यापैकी १ हजार २११ उमेदवारांची निवड झाली असून इतर उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरु आहे
कौशल्य विकास विभागाने बेरोजगार तरुणांना नोकरी आणि उद्योजकांना कुशल उमेदवार मिळवून देण्याच्या अनुषंगाने तयार केलेल्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाचा प्रभावीपणे वापर करून हे मेळावे घेतले गेले. पुणे, सातारा, औरंगाबाद, नागपूर, सांगली आणि ठाणे येथील जिल्हामध्ये कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयांनी प्रत्येकी १ ऑनलाईन रोजगार मेळावा घेतला. नाशिक आणि यवतमाळ येथील कार्यालयांनी प्रत्येकी २ तर उस्मानाबाद मॉडेल करिअर सेंटर यांनी ४ ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित केले.