जिल्हयाबाहेर जाऊन येणाऱ्या व्यक्तींसाठी अँटिजन टेस्ट बंधनकारक

बीड दि.४- बाहेरच्या जिल्हयामधून बीड जिल्ह्यात येणार्‍या व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणच्या शहरी व ग्रामीण भागातील प्रक्रियेसाठीचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जारी केले आहेत. तसेच दररोज जिल्हयाबाहेर जाऊन येणे आवश्यक आहे अशा व्यक्तींसाठी दैनंदिन प्रवासासाठी ई-पास आणि अँटिजेन टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. दरम्यान जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी इतर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त यांना बीड जिल्ह्यात प्रवेशासाठी अत्यावश्यक वगळता इतर ईपास देवू नये असे पत्राद्वारे कळविले आहे.

या विलगीकरण प्रक्रियेसाठीच्या निर्देशानुसार ग्रामीण भागात बाहेरच्या जिल्हयामधून येणारी प्रत्येक व्यक्ती गावाच्या जिल्हा परिषद शाळेत Institutional Quarantine करण्यात येईल. या व्यक्तीसाठी शाळेत पाणी, स्वच्छता इ. या सर्व सुविधा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतची असेल, जेवणाची व्यवस्था शक्यतोवर त्या व्यक्तीच्या कुटूंबाद्वारेच करण्यात येईल. गावामध्ये बाहेर जिल्हयातून येणारा प्रत्येक व्यक्ती कोणाच्याही संपर्कात न येता थेट या Institutional Quarantine केंद्रामध्ये जाईल याची खात्री गावचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व ग्रामदक्षता समिती यांनी करावयाची आहे.

शहरी भागातील बाहेरच्या जिल्हयातून येणाऱ्या सर्व व्यक्तींचा Institutional Quarantine व्यवस्था राहील, सदरील व्यक्तींची माहिती घेवून त्यांना शहरात येताच इतर कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात न येता थेट Institutional Quarantine सेंटरवर आणण्याची जबाबदारी संबंधित मुख्याधिकारी नगर परिषद, नगर पंचायत यांची असणार आहे. यासाठी त्यांना वार्ड दक्षता समितीची मदत घेतली जाणार आहे.

जिल्हयामध्ये सध्या राहणाऱ्या व्यक्ती ज्या काही कारणास्तव जिल्हयाबाहेर जाऊन येतील त्यांना नेहमीप्रमाणेच 28 दिवस होम क्वारंटाईन बंधनकारक असेल, परंतु जिल्हयामध्ये प्रवेश केल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांची अँटिजेन टेस्ट ( Antigen Test) घेण्यात येईल आणि त्यासाठी त्यांना तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाद्वारे ज्या आरोग्य केंद्रावर बोलावण्यात येईल तेथे नियोजित वेळेत येणे बंधनकारक असेल.

दररोज जिल्हयाबाहेर जाऊन येणे आवश्यक आहे दूध विक्रेते, फळभाजी विक्रेते, खाजगी, शासकीय आस्थापना वरील अधिकारी, कर्मचारी आदी अशा व्यक्तींंनी सुध्दा ई-पास काढूनच प्रवास करणे बंधनकारक असेल परंतु ई-पासचा फॉर्म भरतांना दैनंदिन प्रवासासाठी ‘ असा उल्लेख असणे बंधनकारक असेल अन्यथा पास रद्द करण्यात येईल. तसेच असा पास धारण करणाऱ्या व्यक्तींना आठवडयातून एकदा अँटिजेन टेस्ट (Antigen Test ) साठी नियोजित आरोग्य केंद्रावर बोलाविण्यात येईल आणि नियोजित वेळेत तेथे जाणे बंधनकारक असेल अन्यथा आपला पास रद्द करण्यात येईल. अशा सर्व व्यक्तींना याप्रमाणे आरोग्य केंद्रावर आणण्यासाठी सर्व मुख्याधिकारी, ग्रामसेवक यांचे सह सर्व शासकीय संबंधित विभाग संपूर्ण सहकार्य करतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!