ती नऊ गावे कन्टेनमेंट मुक्त; संचारबंदी शिथिल

किल्लेधारूर दि.४(वार्ताहर) कुंडीसह धारुर, माजलगाव व परळी तालुक्यातील नऊ गावे कन्टेन्मेंट मुक्त झाल्याने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशानुसार आज दि.४ संचारबंदी हटविण्यात आली आहे.
तालुक्यातील कुंडी येथील रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतर त्याची दि.३० रोजी जिल्हा रुग्णालयातून सुट्टी करण्यात आली. या रुग्णामुळे कुंडी व परिसरातील ३ कि.मी. परिघातील दहा गावे कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आली होती. यात धारुर तालुक्यातील कुंडी, जैतापुर, सुकळी, मुंगी, शेरीतांडा तहत (देवठाणा) फकीरजवळा, माजलगाव तालुक्यातील वांगी आणि परळी तालुक्यातील तपोवन, खामगाव ही गावे समाविष्ट होती. या प्रतिबंधात्मक क्षेत्रात १४ दिवसात एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आला नसल्याने जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड यांनी शिथिलता देण्याची विनंती केली. यामुळे आज दि.४ रोजी नवीन आदेश जारी करत या गावातील संचारबंदी हटवण्यात आली आहे.