धारुरकरांना दोन दिवसांची प्रतिक्षा
भाजीपाल्याची चणचण असल्याने नागरिक त्रस्त

किल्लेधारूर दि.१(वार्ताहर) धारुरकरांना पुढील आदेशासाठी आणखी दोन दिवस तरी प्रतिक्षा करावी लागणार असून कडेकोट बंद असल्याने नागरीकांना भाजीपाल्याची चणचण भासत आहे. घरपोच किराणा प्रमाणे भाजीपालाही घरपोच करण्याची सोय प्रशासनाने करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
पाचव्या लॉकडाऊन मध्ये इतरत्र सर्वांना सुट मिळाली आहे. मात्र शहरात एक कोरोना रुग्ण आढळून आल्यामुळे गेली चार दिवसांपासून अनिश्चित काळासाठी शहरात संचारबंदी लागू आहे. बाधित रुग्णांच्या कुटूंबियांचे स्वॕब नमुने आता दि.२ रोजी घेण्याचे आरोग्य विभागाने जाहिर केले आहे. दि.३ रोजी या नमुन्याचा अहवाल येणे अपेक्षित आहे. यामुळे किमान दोन दिवस धारुरकरांना कडेकोट संचारबंदी राहण्याची शक्यता आहे. बंदच्या काळात पालेभाजी विक्रेत्यानांही मज्जाव करण्यात आला आहे. पोलिस प्रशासनाने ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवून संचारबंदीची कडेकोट अंमलबजावणी केली आहे. निडली ॲपद्वारे किराणा माल घरपोच करण्याची सोय प्रशासनाने केली असली तरी पालेभाज्या मिळण्यास अडचणी आहेत. यामुळे सध्या नागरिकांना पालेभाज्याची चणचण भासत असून पालेभाज्याही घरपोच मिळण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी अशी मागणी होत आहे.