प्लास्टिक प्रदुषण रोखण्यासाठी दंडात्मक कारवाई करा नसता जनहित याचिका दाखल करणार- प्रा.मुंडे

किल्लेधारूर दि.९ (वार्ताहर) जगभरासह भारत देशातील जनता कोवीड-१९ या भयंकर आजारामुळे भयभीत झालेली आहे. याकाळात प्लास्टिकचा सर्रास वापर होत असून लोक प्लास्टिक जाळून प्रदुषण करत आहेत. अशा व्यक्तीवर प्रशासनाने दंडात्मक कारवाई करुन प्रदुषण रोखावे नसता याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा प्रा.इश्वर मुंडे यांनी निवेदनाद्वारे दिला.
जगभरासह भारत देशातील जनता कोवीड-१९ या भयंकर आजारामुळे भयभीत झालेली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम झालेला आहे. अशा वेळी आपल्या शरिराची रोग प्रतिकारकशक्ती वाढावी या साठी लोकं सकस आहार, व्यायाम, प्रणायाम करत आहेत. परंतु जिल्हाभरात ग्रामिण भागापासून ते नगरपालीका क्षेत्रातील दुकानदार, हॉटेल चालक, ग्रामपंचायत, नगरपालीका सफाई / स्वच्छता कर्मचारी (महीला) व कांही नागरीक सुद्धा आपले दुकान, रस्ता किंवा घरासमोरील प्लॅस्टीक, कचरा जमा करुन त्याची योग्य पद्धतीने विल्यवाट न लावता सहज जाळून टाकतात. या मुळे वायू प्रदूषण होत आहे. त्याचा जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. भारतीय दंड संहिता कलम २७८ अन्वये एखादया ठिकाणचे वातावरण आसपास राहणाऱ्या, कामधंदा करणाऱ्या किंवा सार्वजनिक रस्त्यावरून जाणाऱ्या सरसकट सर्व व्यक्तींच्या आरोग्यास अपायकारक होईल अशा प्रकारे कोणी जाणीवपूर्वक दूषित करील त्याला पाचशे रुपयांपर्यंत दंड द्रव्याच्या शिक्षेची तरतुद आहे. त्याची अमलबजावणी करावी. यासाठी ईश्वर शिक्षण संस्थेचे सचिव, धारुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा सामाजीक कार्यकर्ते प्रा.ईश्वर मुंडे यांनी जिल्हाधिकारी, बीड, पोलीस अधीक्षक, बीड, उप प्रादेशीक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जालना, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. बीड यांना निवेदने देवून प्लॅस्टीक, कचरा जाळणारांना प्रतिबंध करावा. अन्यथा एक महिन्यानंतर मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद यांच्या कडे जनहीत याचीका दाखल केली जाईल असा प्रशासनाला इशारा दिला आहे. या बाबत नव्याने रुजू झालेले संतोष राऊत निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी, बीड यांची भेट घेवून प्रा. ईश्वर मुंडे यांनी या समस्येबाबत चर्चा केली. ही समस्या सोडवणे बाबत जिल्हा प्रशासन संवेदनशीलपणे कायदेशीर प्रयत्न करेल असे अश्वासन अपर जिल्हादंडाधिकारी बीड यांनी दिल्याचे प्रा.ईश्वर मुंडे यांनी सांगीतले आहे.