पाच पॉझिटीव्ह मुळे वाढली धारुरकरांची चिंंता; नियम पाळून करता येईल मात

किल्लेधारूर दि.२(वार्ताहर) शहरात आढळून आलेल्या पाच पॉझिटीव्ह रुग्णांमुळे धारुरकरांची चिंता वाढली असुन नागरिकांनी प्रशासनाचे नियम पाळल्यास मात्र समुह संसर्गावर मात करणे शक्य होणार आहे.
शहरात गेल्या दहा दिवसात पाच पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आली आहेत. विशेष म्हणजे या सर्व रुग्णांना प्रवासाचा कसलाच इतिहास नाही किंवा पॉझिटीव्ह रुग्णाच्या सहवासाचाही इतिहास नाही. या रुग्णांचा सोर्स शोधणे आरोग्य विभागासमोर आवाहन आहे. याचाच अर्थ शहरात पॉझिटीव्ह रुग्णांचा वावर असुन यातूनच समुह संसर्ग होत असल्याचा संशय आहे. यावर मात करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाचे कामाशिवाय बाहेर न पडणे, घरातच राहणे, मोकार गर्दी बंद करणे, मास्क वापरणे, सॕनिटायझर वापरणे या नियमांचे पालन करणे गरजेचे झाले आहे. प्रशासनाकडून रॕपिड टेस्ट वाढविल्यास शहरातील पॉझिटीव्ह रुग्णांची ओळख पटणार आहे. नसता पुन्हा वाढती रुग्ण संख्या धारुरकरांची डोकेदुखी वाढून लॉकडाऊनला सामोरे जाणारी ठरणार आहे. काल पॉझिटीव्ह आलेल्या दोन रुग्णांची संपर्कातील लोकांचा शोध आरोग्य विभागाने सुरु केला असुन या रुग्णांचा संपर्क मोठा असण्याची शक्यता आहे.