भीषण अपघात… रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 19 जणांचा मृत्यू, 25 हून अधिक जखमी.

मुंबई (वृत्तसंस्था) दि.28 जुलै – उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये भीषण अपघात (Accident) झाला असल्याचे समोर आले आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या एका बसला वेगाने आलेल्या ट्रकने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यात बसमधील आणि रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 19 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात 25 हून अधिक लोक गंभीर जखमी आहेत.
(Terrible accident … 19 people sleeping on the side of the road killed, more than 25 injured.)
दरम्यान, मृतांची संख्या वाढू शकते अशी देखील माहिती आहे. माहितीनुसार या अपघातातील मृत आणि जखमी झालेले लोक हे मजूर (Labor) होते. ते पंजाबहून बिहारला चालले होते. बस खराब झाल्याने रस्त्याच्या कडेला उभी केली होती. यामुळे काही प्रवाशी खाली उतरुन बस सुरु होण्याची वाट पाहात होते तर काही जण बसमध्येच होते.
असा झाला अपघात…
लखनौ-अयोध्या राष्ट्रीय महामार्गावर (National Highway), दुहेरी-डेकर बसला भरधाव ट्रकने धडक दिल्याने उत्तर प्रदेशमधील बाराबंकी येथे झालेल्या मोठ्या अपघातात (Accident)19 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील राम सनेही घाट पोलिस (Police) स्टेशनजवळ ही घटना घडली आहे. मंगळवार आणि बुधवारी मध्यरात्री पहाटे दीडच्या सुमारास ही घटना घडली, अशी माहिती माध्यमांनी दिली आहे.
या घटनेत 25 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत, अशी माहिती यूपी पोलिस अधिकाऱ्यांनी दिली असून, जखमी प्रवाशांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात पत्रकारांशी बोलताना लखनऊ झोनचे एडीजी सत्य नारायण साबात यांनी पुष्टी केली की बाराबंकी जिल्ह्यातील राम सनेही घाट जवळील महामार्गावर काल रात्री झालेल्या या भीषण दुर्घटनेत तब्बल 19 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही अनेकजण बसखाली अडकले आहेत, असे ते म्हणाले, सध्या बचावकार्य सुरू आहे. “सीतामढी आणि सहरसा सह बिहारमधील जिल्ह्यातील बहुतांश प्रवासी होते,” असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. “ते पंजाब आणि हरियाणा येथून आपल्या मूळ राज्यात परत जात होते”.
बाराबंकी अपघाताची माहिती देताना एडीजी सत्य नारायण साबत म्हणाले, अॅक्सल शाफ्ट खाली पडल्याची माहिती ड्रायव्हरने प्रवाशांना दिली असता अनेक प्रवासी बसमधून बाहेर पडले. काही क्षणानंतर, एका वेगवान ट्रकने मागून बसला जोरदार धडक दिली. यामुळे महामार्गावर आराम करणाऱ्या अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला; तर अनेक गंभीर जखमी झाले आहेत.