पाहूण्यांच्या धास्तीने स्थलांतर वाढले
नागरिकांत भितिचे वातावरण

किल्लेधारूर दि.१८(वार्ताहर) गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले असुन अनेक जन गल्लीत आलेल्या पाहूण्यांमुळे स्थलांतराला पसंती देत आहेत.
कोरोनामुक्त बीड जिल्हा गेल्या दोन दिवसात चांगलाच चर्चेत आला आहे. माजलगाव व गेवराई तालुक्यात दोन कोरोना रुग्ण सापडल्याच्या पाठोपाठ आष्टीत एकाच कुटूंबातील सात जन कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. आज पहाटे यातील एक कोरोना रुग्ण महिला दगावली. हे सर्व रुग्ण मुंबईहून आल्याची माहिती पुढे आली आहे. गेल्या दोन दिवसांतील या घटनांमुळे नागरिकांत पाहुण्यांबाबत भिती बसल्याचे दिसुन येत आहे. शहरातील विविध भागात शेकडो पाहुणे मुंबई व पुण्याहून आलेली असल्याने शेजारी पाजारी दहशतीत आहेत. यावर अनेकांनी आपला कुटूंब कबिला शेतात किंवा इतर ठिकाणी हलवला असल्याचे दिसत आहे. तर अनेक जन स्थलांतर करण्याच्या तयारीत आहेत. बरीच मंडळी नगर परिषद व आरोग्य विभागाच्या संपर्कात असून या पाहुण्यांना गावाबाहेर कोरोंटाईन करण्याची मागणी करत आहेत.