राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली….

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

किल्लेधारूर दि.१२(प्रतिनिधी) मागच्या पंधरा वर्षांपासून राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करणाऱ्या मात्र अद्यापही सदरील कर्मचारी व अधिकाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेतले नसलेल्या १९ हजार कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी राज्यात कामबंद आंदोलन सुरु केल्याने आरोग्य यंत्रणा ऐन संकट काळात कोलमडली आहे. येथील राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी व आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या तालुका अध्यक्ष श्रीमती सोणवने मनिषा यांनी सेवेत कायम सामावून घेण्यापर्यंत हे कामबंद आंदोलन सुरु राहणार असल्याची माहिती दिली.

आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सर्व कंत्राटी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी मागच्या दोन दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानात महाराष्ट्रात १९ हजार आरोग्य कर्मचारी व अधिकारी २००५ पासून कार्यरत आहेत. त्यामुळे २०१० पासून सदरील कर्मचारी नियमित सेवेत समायोजन करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. आतापर्यंत अनेक मोर्चे आंदोलने करूनही सदरील मागणीची दखल घेतलेली नाही. दरम्यान संबंधित प्रश्नी दोन समित्यांची स्थापना करण्यात आली. तर एका समितीने २०१९ मध्ये समायोजन करण्याच्या बाजूने अहवाल देऊनही अद्याप कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे हजारो कर्मचारी आपल्या हक्कापासून वंचित आहेत. दरम्यान कोरोना काळातही सदरील कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून सेवा बजावत आहेत. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. धारुर येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या समोर तालुक्यातील  संघटनेच्या अध्यक्षा सोनवणे आर.एन., एस.बी. घुगे, एम.एम. पुरी, के.एम. लोखंडे, एस.बी. नरवडे, शेरखाने बी.एम., चौरे एम.बी., झांजे एस.ए., तिडके एस.एस., गिरी आर.बी., इनामदार एम.एच, राऊत एस.डी., गुट्टे, एस. बी. इत्यादी कर्मचारी काम बंद आंदोलन पुकारून धरणे आंदोलन करत आहेत. नियमित सेवेत सामावून घेऊन सर्व लाभ देण्याची मागणी करण्यात येत आहे. तर सदरील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने ऐन कोरोनाच्या संकटात नियमित कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे.

तालुका आरोग्य सेवेत एकुण २२ कंत्राटी कर्मचारी काल पासून कार्यालयाच्या समोर काम बंद आंदोलन करत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे लसीकरणाच्या कमावर थेट परिणाम होणार आहे. संबंधित कर्मचाऱ्यांच्या संघटने बरोबर वरिष्ठ पातळीवर सकारात्मक विचारविनिमय सुरू असून एकदोन दिवसांत कांहीतरी तोडगा निघेल अशी प्रतिक्रिया धारुर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी बीड२४ न्युज शी बोलताना दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!