रुग्णालयातील झाडांना पाणी देऊन जागतिक वसुंधरा दिन साजरा
कायाकल्प फाऊंडेशनचा उपक्रम

किल्लेधारूर दि.२२(वार्ताहर) किल्लेधारूर शहरातील कायाकल्प फाऊंडेशन संस्थेच्या वतीने ग्रामीण रुग्णालयातील झाडांना पाणी देऊन जागतिक वसुंधरा दिन वेगळया प्रकारे साजरा करण्यात आला.
शहरातील कायाकल्प फाऊंडेशन सक्रियपणे वेगवेगळे उपक्रम राबवत सामाजिक कार्य करत आहे. आजपर्यंत या सामाजिक संस्थेने जलसंधारण, वृक्षारोपण, ऐतिहासिक किल्ल्याचे संवर्धन, स्वच्छता अभियान, निराधार बालकांना मदत, वैकुंठ भूमीचे सुशोभीकरण, कोरोना महारोगाच्या विरुद्ध लढाई मध्ये सहभाग, शासकीय योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य असे विविध समाजोपयोगी उपक्रम ह्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून उत्स्फूर्तपणे करत आहे. या संस्थेने अल्पावधीतच सामाजिक कार्यात तालुक्यात आदर्श सामाजिक संस्था म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
दोन दिवसापूर्वी मानवलोक संस्थेचे कार्यवाह अनिकेत लोहिया हे किल्ले धारूर शहरात कोरोना विषाणू संसर्गामुळे लाॅकडाऊन असल्याने नागरिकांना कामधंदा नसल्याने उपजिविकेसाठी पैसा नसल्याने जीवनावश्यक गरजा पूर्ण होत नसल्याने संकटात आहेत त्यांच्या मदतीसाठी आले असताना. त्यावेळी किल्ले धारूर शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे मास्क देण्यासाठी गेले होते या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.चेतन आदमाने साहेब यांनी हा परिसर वृक्ष लागवड करून निसर्गमय करण्याचे ठरवले परंतु याठिकाणी पाण्याची कमतरता आहे असे त्यांनी सांगितले. यावर मानवलोक संस्थेचे कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी कायाकल्प फाऊंडेशन किल्ले धारूर यांनी या ग्रामीण रुग्णालयातील झाडांना दोन महिने पाणी देऊन झाडांचे संगोपन करण्याचे काम करावे असे आवाहान केले. अनिकेत लोहिया यांनी सुचविल्याप्रमाणे झाडांना पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले. आज जागतिक वसुंधरा दिन असल्याने या ग्रामिण रुग्णालयातील सर्व वृक्षांना पाणी देऊन जागतिक वसुंधरा दिन साजरा केला.
यावेळी कायाकल्प फाऊंडेशनचे अध्यक्ष दिनेश कापसे, सचिव विश्वानंद तोष्णिवाल, जलदुत विजय शिनगारे , प्रकाश शिंदे, कृष्णा रत्नपारखे, बंडू कावळे व ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी यांनी या झाडांना पाणी दिले.