रोजच भरतोय बाजार;
पालिकेच्या दुर्लक्षामुळे नियमांचे होते उलंघन

किल्लेधारूर दि.८(वार्ताहर) शहरातील हनुमान मंदिर परिसरात प्रशासनाच्या सर्व नियमांना हरताळ फासत रोज अनाधिकृतरित्या बाजार भरत असुन नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कसलेही नियम पाळले जात नाहीत तर वाहतूकीसही अढथळा निर्माण झाला आहे.
शहरातील नेहमीच गजबजलेल्या मुख्य रस्त्यावर संचारबंदी शिथिल झाल्यानंतर रोजच बाजार भरत आहे. सध्या जिल्हा प्रशासनाने आठवडे बाजार भरवण्यास बंदी घातलेली आहे. धारुर शहरात सोमवार व शुक्रवारचा आठवडे बाजार गेली अडिच महिने बंद आहे. परंतू शहरातील संचारबंदी शिथिल झाल्यानंतर सर्वच व्यापारी, फेरीवाले, हातगाडे, भाजी विक्रेते यांनी पारंपरिक बाजार तळ सोडून हनुमान मंदिर परिसरात बाजार भरवण्यास सुरुवात केली आहे. याभागात मंदिर, मशिद अशा धार्मिक स्थळासह व्यापारी संकुल, बँका, पोस्ट अॉफिस असल्याने परिसर सारखा गजबजलेला असतो. परंतू गेल्या काही दिवसांपासुन बाजार भरत असल्याने मोठ्या अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. विशेषतः या बाजारात कसलेही नियम पाळले जात नाहीत. याच परिसरात नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्सचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. यामुळे वाहतूकीसही मोठा अढथळा निर्माण होत आहे. या अनाधिकृत बाजाराला नगर परिषदेने मुक संमती दिल्याचे दिसत आहे. या बाजारासाठी प्रशासनाने मोकळा परिसर उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे.