विधवा, परित्यक्ता, एकल महिला व ऊसतोड मजुरांच्या मदतीला धावली मनस्विनी

किल्लेधारूर दि.५(वार्ताहर) अंबाजोगाई, केज व धारूर तालूक्यातील २० गावातील विधवा परित्यक्त्या एकल महिलांच्या मदतीला मानवलोकचा मनस्विनी प्रकल्प धावला असून आर्थिक मदती सह जिवनावश्यक वस्तूची मदत करून संकटाचे वेळी मदतीला धाऊन आली आहे.
मानवलोक संचलित मनस्विनी महिला प्रकल्प गेली चाळीस वर्ष डॉ. शैला लोहिया व डॉ. द्वारकादास लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील विधवा, परित्यक्ता, एकल कौटुंबिक हिंसाचार पीडित महिला यांच्यासाठी सातत्याने काम करत आहे. नैसर्गिक आपत्ती किंवा कसलेही संकट समाजा पुढे उभा राहिल्यास मानवलोक मनस्विनी महिला प्रकल्प सर्वात अगोदर समाजासाठी मदत कार्य करत आलेले आहे. सध्या जगात कोरोना या आजारामुळे सर्व लोक त्रस्त असताना व देशात लॉक डाऊन असल्यामुळे असंख्य स्थलांतरित मजूर व विधवा परित्यक्ता महिला यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. या परिस्थितीत विधवा परित्यक्ता महिलांना इतर कोणताच आधार नसल्यामुळे व स्थलांतरीत मजुरांचे हाताला काम नसल्यामुळे या लोकांचे खूप हाल होताना दिसत आहेत. या परिस्थितीचा विचार करून मनस्विनी महिला प्रकल्पाच्या प्रकल्प प्रमुख डॉक्टर अरुंधती ताई पाटील यांनी विधवा परित्यक्ता व स्थलांतरित मजुरांना मदत देण्याचे ठरविले. या कामासाठी मानवलोक चे कार्यवाह अनिकेत लोहिया यांनी हिरवा कंदील दाखवला आणि स्विस एड इंडिया पुणे यांनी या कामासाठी आर्थिक मदत दिली. यामुळे अंबाजोगाई तालुक्यातील २० गावे व धारुर तालुक्यातील १० गावांमधून ३०० विधवा परित्यक्ता महिलांना दोन महिन्याचे राशन साहित्य व दिडशे स्थलांतरित ऊस तोड मजुरांना दोन महिन्याचे राशन वितरित करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून धारुर तालुक्यातील पांगरी, हसनाबाद, गोपाळपुर, सोनीमोहा, जहागिर्मोहा, गांवदरा, अरणवाडी, चोरंबा, तांदळवाडी, असोला या गावातील विधवा परित्यक्ता ऊसतोड मजूर यांना १७५ राशन किट वितरित करण्यात आल्या. या कामासाठी मनस्विनी चे कार्यकर्ते बालाजी वाघमारे, अक्षय गुंजाळ, उमाकांत गोदाम, लखन शिरसाट, संजिवनी जायभाये यांनी प्रत्यक्ष गावात येऊन लाभार्थ्यांना घरपोच धान्य वितरण केले. प्रत्यक्ष लाभार्थी निवडीसाठी व प्रत्येक गरजूंना मदत मिळेल यासाठी यांनी अथक परिश्रम घेतले आहेत.