विवाह इच्छूकासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

बीड दि.७(प्रतिनिधी) सध्याच्या लग्नसराईत कोविड-१९ मुळे मोठ्या अडचणी येवुन विवाह समारंभ खोळंबली आहेत. या संकट काळात पारंपारिक विवाह पध्दतीला फाटा देत नोंदणीकृत विवाह पध्दतीचा अवलंब करुन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले आहे.
सध्या अनेक घरात मुला मुलींचे विवाह करण्याची लगबग सुरु आहे. परंतु लॉकडाऊन मुळे विवाह समारंभ आयोजित केल्यास गुन्हा दाखल होवू शकतो.
अशा लग्न करण्यास इच्छूक वधू वरास नोंदणी विवाह पर्याय ठरु शकतो. विशेष विवाह कायदा १९५४ अन्वये आवश्यक कागदपत्रे पुर्तता करुन नोंदणी विवाह करता येईल. शिवाय या पध्दती मुळे पारंपारिक समारंभात होणारी गर्दी टाळुन अनावश्यक खर्चाला आळा बसतो. शिवाय विवाह समारंभावर फौजदारी कारवाई होण्यापासून सुरक्षा मिळते. याबाबतीत विशेष करुन समाजातील लोकप्रतिनिधी, संघटन, वडीलधारी आदीनी नोंदणी विवाहासाठी जनमानसात जागृती करत नोंदणी विवाहासाठी परावृत्त करावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.