
मुंबईः आयसीएसई बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. दहावीचा निकाल 99.34 टक्के तर बारावीचा निकाल 96.84 टक्के लागला आहे. तर महाराष्ट्रातही दहावी व बारावीचा निकाल जुलै महिन्यात जाहिर करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
देशात आयसीएसई बोर्डाचे दहावीचे एकूण 2 लाख 6 हजार 525 तर बारावीचे एकूण 85,611 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाराष्ट्रात दहावीचे 23,319 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, तर बारावीचे 3,104 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आयएससी म्हणजेच बारावीला एकूण 88,409 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 85,611 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदा कोविड -19 च्या परिस्थितीमुळे निकालाची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार नाही, असे आयसीएसई बोर्डाने स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही दहावी बारावीचे निकाल जुलै महिन्यातच जाहिर करण्यात येण्याचे संकेत दिले. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ येत्या १५ जुलै पर्यंत बारावीचा तर ३१ जुलै पर्यंत दहावीचा निकाल घोषित करु शकते त्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचे मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.