
किल्लेधारूर दि.२१(वार्ताहर) येथील कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयात आश्रित असलेल्या ११७ उसतोड मजूरांपैकी ४९ मजूर आज दि.२१ रोजी दुपारी घराकडे रवाना झाली असुन अद्याप ६८ मजूर पुढील आदेशाच्या प्रतिक्षेत आहेत.
धारुर येथील शिवाजी चौकात दि.३ रोजी सांगली जिल्ह्यातील वेगवेगळ्या कारखान्यातून येत असलेल्या वाहनांवर कारवाई करत उसतोड मजूरांना निवारागृहात ठेवण्यात आले होते. चार दिवसांपुर्वी राज्य शासनाने ऊसतोड मजूरांची घरवापसी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. येथील निवारागृहातील यवतमाळ, हिंगोली व परभणी जिल्ह्यातील ११७ उसतोड मजूरांना याचा फायदा होवून त्यांची रवानगी स्वगृहाकडे होणार आहे. मात्र जिल्हाबंदीमुळे इतर जिल्ह्यात प्रवेशासाठी व जिल्हा सोडण्यासाठी आवश्यक परवानगीची किचकट प्रक्रियेमुळे स्वगृही जाण्यासाठी मजूरांना प्रतिक्षा करावी लागत आहे. यातील परभणी जिल्ह्यातील ४९ ऊसतोड मजूर गावाकडे दुपारी रवाना झाली आहेत. तर हिंगोली जिल्ह्यातील २७ मजूरांना परवानगी मिळाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ४१ ऊसतोड मजूरांच्या जिल्हा प्रवेशाची परवानगी अद्याप मिळालेली नाही. हिंगोली व यवतमाळचे मजूर सोबतच असल्याने ६८ मजूर अद्याप धारुरमध्येच आहेत. यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश प्राप्त होताच त्यांची रवानगी होणार आहे.