दोन महिन्यानंतर बस सेवा सुरु; प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद

किल्लेधारूर दि.२२(वार्ताहर) तब्बल दोन महिने बंद असलेली राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा आज दि.२२ मे रोजी सकाळी सात वाजता सुरु करण्यात आली असुन प्रवाशांनी मात्र आज लालपरीच्या प्रवासाला पाठ फिरवली असल्याचे दिसुन आले.

राज्य शासनाने अध्यादेश काढून नॉन रेड झोनमध्ये जिल्हा अंतर्गत बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावरुन नॉन रेड झोनमध्ये असलेल्या बीड जिल्ह्यात आज पासुन जिल्हा अंतर्गत बससेवा सुरु करण्यात आली. धारुर आगारातून बीड, अंबाजोगाई, केज साठी दर तासाला एक बस सोडण्यात येणार आहे. केज ते माजलगावसाठी दोन बस फेऱ्या करण्यात येणार आहेत. आज सकाळी बस सेवेला प्रारंभ होणार असल्याने रात्री बसस्थानक धूवुन निर्जंतूकीकरण करण्यात आले. एका बसमध्ये केवळ २२ प्रवाशी व इतर नियमांचे पालन करण्यात येणार आहे. दि.२२ मार्च पासुन बंद असलेली बससेवा बरोबर दोन महिन्यानंतर सुरु झाली आहे. धारुर आगाराचे या दोन महिन्यात जवळजवळ तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बससेवा प्रवाशांच्या मागणी प्रमाणे किंवा प्रतिसादाप्रमाणे सुरु राहणार आहे. दोन महिन्यानंतर सुरु झालेल्या लालपरीकडे सध्या तरी प्रवाशांनी पाठ फिरवली असल्याचे दिसत आहे. बससेवा सुरु झाल्यामुळे लोकांत मात्र समाधान व्यक्त केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!