बीड जिल्ह्यातील दुर्दैवी घटना… देवाला अभिषेक घालण्यासाठी गंगेवर गेलेल्या दोन तरुणांना जलसमाधी.

बीड दि.16 एप्रिल – बीड (Beed) जिल्ह्यातील गेवराई (Gevrai) तालुक्यात अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. ज्योतिबाच्या यात्रेनिमित्त देवाला अभिषेक घालण्यासाठी गंगेवर गेलेल्या दोन तरुणांना जलसमाधी मिळून करुण अंत झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका येथील श्री ज्योतिबा यात्रा उत्सव आहे. या यात्रेत प्रतिवर्षी देवाला गंगेच्या पाण्याने अभिषेक घातला जातो. यंदा गावातील तरुणांचा समुह राजापुर येथील गंगेवर (Ganga River) अभिषेक करण्यासाठी गंगाजल आणण्यासाठी दि.15 शुक्रवारी रात्री गेले होते. परत येत असताना आपल्या पैकी दोघे जण कमी असल्याचे तरुणांच्या लक्षात आले.
मोहन आतकरे (17) व शिवाजी इंगोले (19) हे दोन युवक दिसत नसल्यामुळे त्यांचा रात्रीस पाण्यात शोध सुरु केला. याची माहिती गावकऱ्यांना देण्यात आली. गावकऱ्यानी अख्खी रात्र युवकांचा पाण्यात शोध घेतला. घटनेची माहिती प्रशासनाला देण्यात आली. इकडे गावकरी गंगा पात्रात युवकांचा शोध घेतच होते.
आज दि.16 शनिवारी सकाळी 10 च्या सुमारास गावकऱ्यांना दोन्ही मुलांचे शव हाती लागले. घटनास्थळी पोलिस (Police) दाखल झाले असून पंचनामा करुन शव तलवडा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेने मात्र गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
( The unfortunate incident in Beed district … Jalasamadhi to two young men who went to the Ganges to anoint God. )