विद्यार्थी व पालकांसाठी खुषखबर… 13 जुनपासून वाजणार शाळांची घंटा.

मुंबई दि.6 जुन – गेली दोन वर्ष कोरोनासाथीमुळे शिक्षणाचा खोळंबा झाला आहे. शैक्षणिक वर्षे वाया गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र कोरोना संकट टळल्यानंतर आता तिसऱ्या वर्षी आवश्यक ती सर्व काळजी घेऊन 13 जूनपासून शाळा सुरू करण्यात येतील, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी रविवारी केली.
महाराष्ट्रात सलग दोन वर्ष कोरोना संकटामुळे शाळा व महाविद्यालय बंद होती. दुसऱ्या लाटेनंतर जवळजवळ दोन ते तीन महिने शाळा, महाविद्यालय सुरु राहिली. यानंतर उन्हाळी सुट्या जाहिर झाल्या. मात्र पुन्हा
राज्यात कोरोनाने डोके वर काढले आहे. गेल्या आठवड्यापासून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक सत्रात शाळा सुरू होणार का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मात्र दोन शैक्षणिक वर्षे वाया गेल्यामुळे यावर्षी शाळा वेळेवर सुरू करण्याची भूमिका राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतली आहे. येत्या 13 जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होईल, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
वाढती कोरोना रुग्ण संख्या पाहता खबरदारी म्हणून शाळांमध्ये मास्कसक्ती करायची की नाही, याचा निर्णय काही दिवसांत घेण्यात येईल, अशी माहिती यावेळी गायकवाड त्यांनी दिली. माध्यमांशी बोलताना वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) म्हणाल्या, गेली दोन वर्षे कोरोनामुळे शाळा बंद ठेवाव्या लागल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. काही मुले तर शाळेत न जाता पुढे गेली आहेत. त्यामुळे हे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे आवश्यक काळजी घेऊन शाळा सुरू करण्यात येतील.
शाळांसाठी कोरोना नियम पुन्हा लागणार?
राज्य सरकारकडून गेल्या वर्षी नियमावली (guidelines) लागू करून अखेरच्या सत्रात शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. शाळेत एका वेळी एका वर्गात किती विद्यार्थी बसवायचे, मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे याचबरोबर पालकांकडून उपस्थितीबाबत परवानगी पत्र भरून घेणे असे नियम करण्यात आले होते. शिक्षकांना कोरोना चाचणी करून घेणे सक्तीचे करण्यात आले होते. त्यामुळे असे काही नियम लागू करून नवीन शैक्षणिक सत्र (Academic year) सुरू होण्याची शक्यता आहे.
( Good news for students and parents … school bells will ring from 13th June. )