थोड्याच पावसात साचते छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाण्याचे डोह

किल्लेधारूर दि.१०(वार्ताहर) येथील बसस्थानका समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात थोड्याच पावसात पाण्याचे डोह साचत असल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या कामावर शंका उपस्थित केली जात आहे.
शहरातील प्रमुख चौक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पावसाळ्यात पाण्याचा मोठा डोह दिसुन येतो. गतवर्षी शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ सी रस्त्याचे काम झाले. याकाळात या चौकातील रस्ता रुंदीकरण प्रश्न बराच गाजला. यावेळी अतिशय घाईघाईत रस्ते विकास महामंडळाकडून रस्त्याचे काम करण्यात आले. नालीबांधकाम व्यवस्थित नसल्याने पाणी निघण्यास अडचण येते. बस स्थानक व शहराच्या मुख्य रस्त्यावर पाण्याचा योग्य उतार काढला नसल्याने पाणी साचते. अगदी थोड्याशा पावसातही मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याचे दिसुन येते. यामुळे रहदारीस व वाहतूकीस मोठी अडचण निर्माण होते. माजलगाव मध्येही अशाच स्वरुपाचा प्रश्न निर्माण झाल्याने नुकतीच रस्ते विकास महांमडळाच्या अधिकाऱ्यानी पाहणी केलि. याच प्रमाणे याची दखल घेवून सदरील पाण्याला वाट करुन नागरीकांची गैरसोय दुर करावी अशी मागणी नागरीकांतून होत आहे.