‘ब्रेक द चेन’मोहिमेस विरोध वाढला; निर्णय बदला नसता व्यापाऱ्यांनी दिला हा इशारा ….

मुंबई दि.7 एप्रिल- राज्य सरकारने कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ (Break The Chain) मोहिम सुरु केली. या मोहिमेअंतर्गत लागू केलेल्या कठोर निर्बंधांमुळे व्यापाऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (Maharashtra Chamber of Commerce and Industries) तर्फे व्यापारी संघटनांच्या प्रमुखांची मंगळवारी ऑनलाईन बैठक पार पडली. यात याचा निषेध करुन फेरविचार करण्यासाठी राज्य सरकारला दोन दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. तसेच काही झाले तरी येत्या शुक्रवारपासून दैनंदिन व्यापार, व्यवहार सुरळीत ठेवण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला आहे.

(Opposition to the ‘Break the Chain’ campaign grew; This warning was given by the traders without changing the decision ….)

महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढ होत असलेल्या कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्यात कठोर निर्बंध लादण्यात आली आहेत. यात सर्वसामान्य छोट्या व्यवसायिकांचे मोठे हाल होत आहेत. सुरुवातीला केवळ दोन दिवस संपूर्ण लॉकडाऊन (lockdown) असेल असे जाहीर झाल्याने निर्णयाचा स्विकार करण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र केवळ अत्यावश्यक असणाऱ्या आस्थापना शिवाय सर्वच व्यवसाय बंदची अंमलबजावणी सुरु झाल्याने व्यापाऱ्यांत संभ्रम निर्माण होवून संतापाची लाट निर्माण झाली.

राज्य शासनाच्या या भुमिकेमुळे व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला तर विरोधी पक्षानेही हा विश्वासघात असल्याची प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली काल ऑनलाईन बैठक झाली. यात वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी, महाराष्ट्र चेंबरच्या ट्रस्ट बोर्डचे चेअरमन आशिष पेडणेकर, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख राजेंद्र बाठीया, ‘केमीट’चे चेअरमन मोहन गुरनानी, यांच्यासह कोल्हापूर, पुणे, नाशिक, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव, धुळे, सोलापूर, परभणी आदी जिल्ह्यांतील व्यापारी संघाचे प्रमुख सहभागी झाले होते.

राज्यभरातील व्यापारी संघांच्या प्रमुखांनी ‘विकएण्ड लॉकडाऊन’च्या नावाखाली ‘ब्रेक द चेन’ (Break The Chain) मोहिमेत ‘पूर्ण लॉकडाऊन’ (lockdown) करण्याचा घाट सरकारने घातल्याचा आरोप करून त्याचा तीव्र शब्दांत निषेध करून कोणत्याही परिस्थितीत व्यापारी सहभागी होणार नाहीत, अशा भावना व्यक्त केल्या. सर्व व्यापारी संघटनांच्या वतीने महाराष्ट्र चेंबरने राज्य शासनाशी चर्चा करावी व हा आदेश तत्काळ दुरुस्त करून घ्यावा व व्यापार सुरळीत सुरू करण्यास सहकार्य करावे, अशी मागणी एकमुखाने केली.

सर्व सूचनांचा विचार करून, यासंबंधी राज्य शासनाला दोन दिवसांचा वेळ देण्याचा निर्णय महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे (Maharashtra Chamber of Commerce and Industries) घेण्यात आला. राज्य शासनाला यासंदर्भातल्या ठरावाची प्रत पाठवून गुरुवारी सायंकाळी सहापर्यंत सरकारकडून अपेक्षित निर्णय न झाल्यास, शुक्रवारपासून राज्यभरातील सर्व व्यापारी कोरोना प्रतिबंधाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून आपापले व्यवसाय सुरू करतील, असा इशाराही सरकारला देण्यात आला. उपस्थित सर्व प्रतिनिधींच्या सूचनांचे एकत्रीकरण करून त्याचा आढावा ललित गांधी यांनी घेतला. राज्यभरातल्या व्यापारी संघाने दिलेली ही जबाबदारी महाराष्ट्र चेंबर समर्थपणे पार पडेल, अशी ग्वाही सर्वांना दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!