औरंगाबाद प्रकरणी आठवलेंचा इशारा…या शहराच्याही नामांतराची मागणी…

औरंगाबाद शहराच्या नामांतराचा विषय चांगलाच पेटला आहे…
मुंबई: दि.४- औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या प्रकरणात आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आणि आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनीही विरोध दर्शवणारा व्हिडीओ रविवारी व्हायरल केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नामांतराचे वाद राज्य सरकारने बाजूला ठेवुन खडतर दिवसांना सामोरे जात असलेल्या जनतेच्या विकासाचे, विधायक मुद्दे बाजूला ठेवून सत्ताधाऱ्यांनी नामांतराचे मुद्दे रेटू नयेत, असे आठवले यांनी सांगत आंदोलनाचाही इशारा दिला आहे. औरंगाबाद नामांतराचा मुद्दा समोर आलेला असताना आता पुणे (Pune) नाव जिजापूर करा अशी मागणी संभाजी ब्रिगेड (Sambhaji Brigade) कडून करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद (Aurangabad) च्या नामांतराचा विषय चांगलाच पेटलेला आहे. या विषयात सत्ताधारी व विरोधक आमने सामने आलेले असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी यात उडी घेतली आहे. औरंगाबादचे नाव औरंगाबादच राहिले पाहिजे, त्याचे नामांतर करता कामा नये. या सरकारने औरंगाबादचे (Aurangabad) नाव बदलण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देणारा व्हिडीओ आठवले यांनी रविवारी जारी केला. नामांतरास विरोध दर्शवताना आठवले म्हणाले, सध्या कोरोनाचे संकट आहे, अशा वेळी नामांतरासारखे मुद्दे आणू नयेत. छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही आदर्श मानणारे आहोत. मात्र, संभाजी महाराजांच्या नावाचा कोणी राजकारणासाठी वापर करू नये. आम्ही १७ वर्षे नामांतराच्या आंदोलनाची धग भोगली आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘पुणे’ नाव बदलून ‘जिजापूर’ करा- संभाजी ब्रिगेड
संभाजी ब्रिगेडनेही नामांतरासंदर्भातच आपली जुनी मागणी पुढे रेटली आहे. त्यांनी पुणे (Pune) शहराचे नामांतर करुन पुण्याला ‘जिजापूर’ असे नाव द्या, अशी मागणी केली आहे. याबाबत बोलताना संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करायला वेळ लागत असेल तर राष्ट्रमाता जिजाऊंनी बेचिराक झालेल्या पुणेला वसवलं. त्या पुण्याला जिजाऊंचे नाव देऊन पुण्याचे ‘जिजापूर’ असे नामांतर करून टाका. पुण्याला जिजाऊंचा इतिहास असल्याची प्रतिक्रिया दिली.