बीड नगर परळी रेल्वे… प्रत्यक्षात प्रवासी रेल्वे उद्यापासून धावणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन प्रणालीद्वारे करणार शुभारंभ.

बीड दि.2 फेब्रुवारी – उद्या पहिल्यांदाच परळी बीड नगर रेल्वे मार्गावर नगर ते आष्टी बारा डब्ब्यांची प्रवासी रेल्वे धावणार आहे. पहिली पॅसेंजर रेल्वे गाडी नगर ते आष्टी या 67 किलोमीटर अंतरावर सुरू होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा शुभारंभ ऑनलाइन प्रणालीद्वारे दिल्लीतून हिरवा झेंडा दाखवून करणार आहेत.

(Ahmednagar to Ashti passenger train to run; Prime Minister Narendra Modi will launch through online system.)

एकूण 261 किलोमीटर नगर परळी रेल्वे मार्गाची लांबी आहे. नगरपासून आष्टीपर्यंत 67 किलोमीटर अंतराचे काम पूर्णही झाले आहे. या मार्गावर रेल्वे विभागाने गेल्याच महिन्यात  चाचणी घेतली होती. या रेल्वेची चाचणी मागील महिन्यांमध्ये पूर्ण झाल्यामुळे प्रत्यक्षात प्रवासी रेल्वे (railway) कधी सुरू होणार याकडे त्यांचे लक्ष लागले होते .

दरम्यान बीड जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी नगर बीड परळी रेल्वे मार्ग कायम राहिला आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकासुद्धा या रेल्वे मार्गच्या प्रश्नाभोवती फिरताना पाहायला मिळाल्या आहेत.

नगर बीड परळी रेल्वे मार्ग संदर्भात भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांनी कायम केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. अगदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपदी विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) असताना बीडच्या रेल्वेमार्गासाठी अर्धा निधी राज्य सरकार देणार असल्याची घोषणा झाली होती आणि आज पर्यंत केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून या रेल्वे मार्गासाठी भरीव तरतूद झालेली आहे.

261 किलोमीटरचा अहमदनगर बीड परळी रेल्वे मार्ग असून हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून रखडला होता. रेल्वेमुळे औद्योगिक वसाहती निर्माण होण्यात मोठ्या अडचणी होत्या. त्याचबरोबर बीड जिल्ह्यात उत्पादित झालेला शेतमाल किंवा इतर कच्चामाल परराज्यात किंवा परजिल्ह्यात नेण्यासाठी रेल्वे नसल्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या.

नगर – बीड – परळी रेल्वे मार्गला 1995 साली तत्वतः मंजुरी मिळाली होती. पण त्यानंतर राजकीय इच्छाशक्तीअभावी या मार्गाचे काम अनेक वर्ष रखडले. सद्यस्थितीत हा प्रकल्प तीन हजार कोटीच्या पुढील असून नगर ते आष्टी साठ किलोमीटरची पटरी रेल्वे धावण्यासाठी सज्ज झाली आहे.

सात डब्याच्या रेल्वेची चाचणी अहमदनगर ते नारायणडोह दरम्यान 7 कि.मी.अंतरावर मार्च 2018 रोजी झाली होती, त्यानंतर 25 फेब्रुवारी 2019 रोजी 7 डब्याची रेल्वे चाचणी अहमदनगर – नारायणडोह – सोलापूरवाडी या 15 कि.मी. अंतरावर झाली. पण नंतर लॉकडाऊनमुळे पुढील काम मंदावले आणि आष्टीपर्यंत कधी रेल्वे चाचणी होणार हा प्रश्न ऐरणीवर आला होता त्यानंतर सोलापूर वाडी ते आष्टी 32 किमी अंतरावर 20 डिसेंबर 2021 रोजी चाचणी घेण्यात आली.

67 किलोमीटर अंतर अहमदनगर (Ahemadnagar) ते आष्टी असून या दरम्यान सदरील रेल्वेगाडी सहा ठिकाणी प्रवाशांची चढ-उतार करणार आहे. यामध्ये प्रथम नारायणडोह, लोणी, सोलापूर वाडी, धानोरा, कडा व आष्टी या रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. लवकरच आष्टी तालुक्यातील पाच व नगर जिल्ह्यातील एक स्थानकावर तिकीट गृह सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास सुलभ होणार आहे.

पुणे, मुंबई व इतर ठिकाणी जाण्यासाठी आष्टीच्या आसपासच्या पाथर्डी, जामखेड, कर्जत, पाटोदा, शिरूर, बीड (Beed) इत्यादी तालुक्यातील नागरिकांना या रेल्वेचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तसेच व्यापारी वर्ग यांना मुंबई, पुणे, दिल्ली, इंदोर, गुजरात, सुरत इत्यादी ठिकाणाहून माल आणण्यास या रेल्वे गाडीचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. यामुळे उद्योग धंद्यास चालना मिळून रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) याचा शुभारंभ ऑनलाइन (online system) प्रणालीद्वारे दिल्लीतून हिरवा झेंडा दाखवून करणार आहेत. त्यांच्यासमवेत यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनकुमार, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे (Pritam Munde) आणि नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) हे उपस्थित राहणार आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!