वादळात अडकलेलं भारतीय जहाज समुद्रात बुडालं; 146 जणांना वाचवण्यात यश तर 170 बेपत्ता.

मुंबई दि.18 मे – गेल्या दोन दिवसांत तौक्ते चक्रीवादळाने (Cyclone Tauktae) मुंबईला (Mumbai) झोडपून काढले आहे. मुंबईच्या समुद्री भागात 175 किलोमिटर दूर अंतरावर हीरा ऑयल फील्ड्सजवळ अडकलेलं एक भारतीय जहाज P-305 समुद्रात बुडालं. भारतीय नौदलाला खवळलेल्या समुद्रातून 146 लोकांना सुखरूप वाचवण्यात यश आले असून अद्याप 170 पेक्षा जास्त लोकं बेपत्ता आहेत.
(An Indian ship sank in a storm; 146 rescued while 170 missing.)
अवघे जग कोरोनाच्या संकटाशी लढत असतानाच आज ‘तौक्ते’ चक्रीवादळाने मुंबई, रायगड, ठाणे व पालघर जिह्याला जोरदार तडाखा दिला. गेल्या दोन दिवसांपासूनच ‘तौक्ते’ आपली झलक दाखवत होता. पण किनारपट्टीवर हे वादळ धडकले आणि एकच हाहाकार उडाला.
बेभान वारे तसेच तुफानी पाऊस यामुळे अनेक ठिकाणी होत्याचे नव्हते झाले. शेकडो झाडे उन्मळून पडली असून हजारो घरांचे नुकसान झाले आहे. या वादळाने एकूण सातजणांचा बळी घेतला आहे. यातच मुंबई नजीकच्या समुद्रात दोन भारतीय जहाज अडकल्याची माहिती आली. एका जहाजावर बचावकार्य करण्यात आले.
खवळलेल्या समुद्रात याच भागात आणखी एक जहाज अडकले आहे. या जहाजावर अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी INS कोलकात्ताला पाठवले आहे. या जहाजावर 137 लोकं अडकलेली आहेत. त्यापैकी 38 जणांना सुखरुप बाहेर काढले आहे. ‘तोक्ते’ चक्रिवादळ (Cyclone Tauktae) शमलं असलं तरी खोल समुद्रात मात्र अजूनही वातावरण प्रचंड प्रतिकूल आहे.
सध्या समुद्राला जीवघेणं उधाण आलेलं आहे. भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाला गेल्या दोन दिवसात खोल समुद्रात अडकलेल्या जहाजांवरून चार SOS चे कॉल आलेत. त्यामुळे भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाचं मोठं रेस्क्यू ॲापरेशन सध्या अरबी समुद्रात सुरू आहे. भारतीय नौदलाने (Indian Navy) मुंबईच्या नौदल एअर बेस INS शिक्रा येथून सी किंग हेलीकॉप्टर बचाव कार्यासाठी पाठवलं आहे.
बार्ज P305 या प्रवासी जहाजावर 273 प्रवासी आणि खलासी अडकलेत. त्यापैकी 146 प्रवाश्यांना भारतीय नौदलाच्या (Indian Navy) INS कोची आणि INS कोलकाता या युद्धनौकांनी वाचवून सुरक्षितपणे बाहेर काढलंय. त्यानंतर गल कस्ट्रक्ट्रर या जहाजावर 137 प्रवासी होते. या जहाजावरील प्रवाश्यांना वाचवण्यासाठी तटरक्षक दलाने टोईंग बोट वाटर लिली आणि CGS सम्राट घटनास्थळी पाठवली आहे. त्यांचं तिथे बचाव कार्य सुरू आहे.
ॲायल रिंग सागर भूषण प्रकल्पावर 101 कर्मचारी अडकलेत. या सर्व कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी नौदलाने INS तलवार युद्धनौकेला कालच पाठवलं होतं. पण उधाणलेल्या समुद्रामुळे त्यांना बचाव कार्यात मोठा अडथळा येत आहे. त्यांचं बचाव कार्य अद्याप सुरूच आहे. बार्ज SS-3 या प्रवासी जहाजावर 196 प्रवासी अडकले. त्यांना वाचवण्यासाठी भारतीय नौदल हेलीकॉप्टर पाठवत असल्याची माहिती मिळतेय.