महाराष्ट्रात उद्यापासून अंशतः लॉकडाऊन? फिप्टी फिप्टीचा फॉर्मुला.

मुंबई दि.1 एप्रिल – महाराष्ट्रात लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) लागणार की नाही, अशी धाकधूक लागलेली असतानाच आता एक मोठी शक्यता समोर आली आहे. महाराष्ट्रात येत्या 2 एप्रिलपासून मर्यादित लॉकडाऊन लावण्याची (Maharashtra lockdown) तयारी सुरु झाल्याची माहिती आहे. मात्र, हा लॉकडाऊन मागील लॉकडाऊनहून काहीसा वेगळा असेल. या लॉकडाऊनचं स्वरुप 50 टक्के लॉकडाऊन आणि 50 टक्के निर्बंध असे असण्याची शक्यता आहे.
(Partial lockdown in Maharashtra from tomorrow? Fifty Fifty’s formula.)
मागील वर्षी म्हणजेच 25 मार्च 2020 रोजी देशात पहिला लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. 25 मार्च ते 14 एप्रिल असा 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला होता. पुढे हा लॉकडाऊन वाढत वाढत गेला. लॉकडाऊनच्या वर्षानंतर महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाचं थैमान सुरु झालं आहे. महाराष्ट्रात गेल्या आठवड्याभरात दररोज 30 हजारापेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनची टांगती तलवार राज्यावर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महत्वाची बैठक दोन दिवसापूर्वी पार पडली. या बैठकीत लॉकडाऊनच्या निर्णयाबाबतही चर्चा झाल्याचे कळते. त्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचं नियोजन करण्याचे निर्देश दिले होते.
कोरोनासोबतच लॉकडाऊन या शब्दानेही डोकं वर काढलं आहे. काही दिवसांपासून संपुर्ण लॉकडाऊन लावण्याचा सुतोवाच होत असताना आता नवीन माहिती समोर येत आहे. जर 2 एप्रिलला लॉकडाऊन लागलाच तर तो आधीच्या लॉकडाऊनहून वेगळा असणार आहे. गर्दीची ठिकाणं पूर्ण बंद ठेवण्याची चिन्हं आहेत. आधीच्या लॉकडाऊनमध्ये सगळ्याच गोष्टी बंद करण्याचे आदेश होते. तर या लॉकडाऊनमध्ये फक्त गर्दीची ठिकाणं बंद केली जातील. आता ही गर्दीची ठिकाण म्हणजे शॉपिंग मॉल, मल्टिप्लेक्स, समुद्र किनारे, गार्डन्स, नाट्यगृह. थोडक्यात ज्या ज्या ठिकाणी विरंगुळ्यासाठी लोक एकत्र जातात, ती सगळी ठिकाणं बंद केली जातील.
मागील लॉकडाऊन हा सलग 24 तास लागू होता. यंदा अशा स्वरुपाच्या लॉकडाऊनला मोठा विरोध पहायला मिळत आहे. मात्र आताच्या लॉकडाऊनला विशिष्ट वेळ दिली जाण्याची शक्यता आहे. ती वेळ कदाचित सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंतची असू शकेल. सध्या अनेक शहरात नाईट कर्फ्यू लावला गेलेला आहे. त्याच धर्तीवर नाईट कर्फ्यू न लावता दिवसा कर्फ्यू लावण्याची तयारी प्रशासन करत आहे. शिवाय हा लॉकडाऊन अगदी 5 किंवा 7 दिवसांचा असू शकतो, दीर्घ कालावधीचा लॉकडाऊन नसेल अशी प्राथमिक माहिती आहे.
मागील लॉकडाऊनमध्ये विशिष्ट परवानगीधारकांना भाजीपाला विकण्याची मुभा होती. या लॉकडाऊनमध्ये भाजीपाल्याच्या बाजारपेठा आणि किराणा दुकानं एका विशिष्ट वेळेत उघडी ठेवण्याची मुभा असेल. जेणेकरुन अन्नधान्याचा कुठलाही तुटवडा होणार नाही. शिवाय दुकानदार, शेतकरी यांचंही नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेणार आहे.
मागील वेळी आंतरजिल्हा बस बंद झाल्या होत्या तशा याही वेळी होतील का? तर सुरुवातीला तरी असं केलं जाणार नाही. आंतरजिल्हा बस बंद करण्याचा निर्णय परिस्थिती खूपच खराब झाली तर घेतला जाईल असं सरकारी सूत्रांकडून कळतंय. कारण, आंतरजिल्हा वाहतूक बंद केली तर औद्योगिक आणि कृषी क्षेत्राचं मोठं नुकसान होतं. ते यंदा होऊ न देण्याचा प्रयत्न सरकारचा असणार आहे.
बसस्टँडपासून रेल्वेस्टेशनपर्यंत कोरोना चाचण्या करण्याचं नियोजन
हेच नाहीतर रेल्वेस्टेशन्स, विमानतळं, बसस्थानकं इथं कोरोना चाचण्या करण्याचंही धोरण सरकारने ठरवलं आहे. जास्तीत जास्त चाचण्या करुन कोरोना रुग्णांन वेगळं करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. शिवाय, लसीकरणाचीही गती वाढवून निवडणुकांच्या धर्तीवर लसीकरण केलं जाणार आहे. लोकांना लसीकरण बूथपर्यंत आणण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांपासून स्वयंसेवकांना नेमण्याचाही विचार सरकार करतंय.
एकूणच लॉकडाऊनचा अर्थ वर्षभरात बदलला आहे. अर्थकारणाला फटका न देता, लॉकडाऊन करण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. मात्र, हा लॉकडाऊन होऊच नये यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग आणि काही लक्षणं दिसली की लगेच कोरोना चाचणी करणं गरजेचं आहे. लॉकडाऊन लागलाच, तर त्याचं काटेकोरपणे पालनही गरजेचं आहे.